
सध्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा राज्यभर चर्चेचा ठरत आहे.
मुंबई/औरंगाबाद: सध्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा राज्यभर चर्चेचा ठरत आहे. कारण या नामांतर मुद्द्यावर सुरुवातीला भाजप-शिवसेना नेते एकमेकांवर टीका करताना दिसले होते. नंतर यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनीही उडी घेतली होती.
महसूल मंत्री थोरातांनी औरंगाबादचे नामांतर करण्यास विरोध दर्शविला आहे. संभाजीराजेंचा आम्हाला आदर आणि अभिमान आहे पण शहराचं नाव बदलून वातावरण खराब करू नये असं मत त्यांनी पत्रकार परिषदेत मांडलं आहे. याअगोदर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही सगळे नेते एकत्र येऊन चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं सांगितले होते.
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 6, 2021
'काँग्रेसची भूमिका नेहमीच स्पष्टपणे मांडत राहणार. शहरांची नावं बदलून लोकांच्या आयुष्यात काय बदल झाले आहेत? असा प्रश्नही मंत्री थोरातांनी विचारला आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रमानुसार विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त विकासावर लक्ष दिलं पाहिजे असं मतही बाळासाहेब थोरातांनी मांडलं आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 6, 2021
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असं ट्विट बाळासाहेब थोरातांनी केलं आहे.