बाहेरून आले अन् रुग्ण वाढले - चिरंजीव प्रसाद 

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ ही इतर गावांहून आलेल्या नागरिकांमुळेच झाल्याचे बऱ्याच केसेसवरून पुढे आले आहे. शिवाय, लक्षणे असतानादेखील रुग्णांनी उशिरा उपचार घेतले. तोपर्यंत त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना संसर्ग झाला होता. अशा अनेक केसेस आतापर्यंत समोर आल्या आहेत, असा दावा पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बुधवारी (ता.२७) केला. शिवाय, उद्यापासून जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी वाहनांचा वापर टाळा. पायी जा, हातात पिशवी असावी. त्याचप्रमाणे मास्क लावणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 सद्यःस्थितीबाबत माहिती देताना चिरंजीव प्रसाद म्हणाले, की जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी काही नागरिक एका परिसरातून उगीच दूरच्या परिसरात जातात. उद्यापासून नागरिकांनी राहत असलेल्या परिसरातच पायी जाऊन वस्तूंची खरेदी करावी, त्यासोबतच तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा दमही त्यांनी दिला आहे. 

राज्य राखीव दलाचे जवान मालेगावात बंदोबस्तासाठी गेले होते. तेथून परतलेल्या ७३ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर समोर आले. अशाच केसेस जयभीमनगर, भीमनगर, किलेअर्क, समतानगर, मुकुंदवाडीतील संजयनगर, रामनगर, पुंडलिकनगर या भागात घडल्याचे निदर्शनास आले आहे. संशयितांनी वेळीच उपचार घेतले नाहीत. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला.

पोलिस दलातील एक अधिकारी व बारा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी एक निरीक्षक व कर्मचारी अशा पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सात जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. सुशिक्षित नागरिकांकडून देखील चुका होत असल्याची आतापर्यंतची बरीच उदाहरणे आहेत. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. अनेक जण सर्दी, खोकला व ताप असूनही नागरिकांशी संपर्क साधत आहेत. त्यात वयोवृद्धांनी जास्तीत जास्त काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 

होम क्वारंटाइन बाहेर फिरताहेत 
होम क्वारंटाइन असतानादेखील काही नागरिक बाहेर का पडत आहेत? अशा नऊ जणांविरुद्ध आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. ज्या नागरिकांच्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे त्यांनी त्या रुग्णापासून सावध राहत त्याला बाहेर फिरण्यास मज्जाव करायला हवा. कोरोनाचा धोका सध्या तरी टळलेला नाही, हे ओळखायला हवे. 

बारा हजार परप्रांतीय परतले घरी 
विविध भागांतून आलेल्या बारा हजार परप्रांतीयांना आतापर्यंत घरी पाठविण्यात आलेले आहे. एका बसमध्ये प्रत्येकी २५ जण अशा २१० बसमधून चार हजार, तर रेल्वेतून नऊ हजार मजुरांना पाठविण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त मीना मकवाना यांनी सांगितले. पश्चिम बंगालचे दोनशे जण सध्या संपर्कात आहेत; पण तेथे वादळाचा धोका असल्याने त्यांना पाठवणे शक्य नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com