
औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे लग्नसमारंभात वऱ्हाडींनी मास्क लावला नाही व ५० जणांचा नियम पाळला नाही तर संबंधित मंगल कार्यालयाला एका महिन्यासाठी सील ठोकले जाईल. तसेच ज्या दुकानात विनामास्क ग्राहक दिसतील ती दुकानेदेखील सील केली जातील, असा इशारा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी (ता. २४) दिला.
कोरोनामुळे गतवर्षी अनेकांनी लग्नसमारंभ पुढे ढकलले तर काहींनी लॉकडाउन शिथिल होताच शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार कमी वऱ्हाडींच्या संख्येत सोहळे उरकून घेतला. आता शासनाने मंगल कार्यालये खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मंगल कार्यालयातील गर्दी वाढली आहे. यासंदर्भात श्री. पांडेय म्हणाले, लग्नसमारंभासाठी मंगल कार्यालयात वऱ्हाडींची मोठी गर्दी होत आहे. अनेक जण विनामास्क दिसत आहेत.
वऱ्हाडींनी मास्क वापरलाच पाहिजे याची जबाबदारी मंगल कार्यालय चालक-मालकांवर टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. लवकरच आदेश काढले जातील. वऱ्हाडींनी मास्क घातलेला नसेल तर संबंधित मंगल कार्यालय एक महिन्यासाठी बंद केले जाईल, दुकानांमध्ये मास्क न घातलेले ग्राहक आढळले तर संबंधित दुकान सील केले जाईल. ग्राहकांच्या मास्कची जबाबदारी आता दुकानदारांवर असेल. मास्क घातलेल्या ग्राहकांनाच दुकानदारांनी प्रवेश द्यावा, असे दुकानदारांना सांगितले जाणार आहे.
पुन्हा कठोरपणे कारवाई
रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून ५०० रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नागरिक मित्र पथकाच्या माध्यमातून सध्या दंडात्मक कारवाई सुरू आहे. दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई कठोरपणे केली जाईल, असा इशारा यावेळी प्रशासक श्री. पांडेय यांनी दिला.
Edited - Ganesh Pitekar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.