फुलंब्री- वाळूज येथे काम करणारे मध्य प्रदेशातील ३७ कामगार खुलताबाद- फुलंब्री मार्गे मध्य प्रदेशात पायी जात असताना अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.३०) कामगारांना अडवून पाल फाटा येथील खासगी शाळेत या कामगारांची व्यवस्था केली होती; मात्र प्रशासनाला गुंगारा देऊन मध्य प्रदेशातील ते ४७ कामगार गायब झाले असल्याचा प्रकार मंगळवारी (ता.३१) उघडकीस आला आहे.
हेही वाचा - बामुतील बंदला तिसऱ्यांदा मुदतवाढ
मजुरांची परतीची वाट
लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने कामगार आपापल्या मूळगावी परतत आहे. सध्या संचारबंदी असल्याने सर्वच उद्योगधंदे बंद पडलेले असल्यामुळे या कामगारांना खाण्यापिण्याची कुठलीही व्यवस्था परिसरात राहिली नाही. त्यामुळे वाळूज परिसरात काम करणाऱ्या मध्य प्रदेशातील ४७ मजूर कामगारांनी मध्य प्रदेशची वाट धरली होती. वाळूजवरून खुलताबाद-फुलंब्री-सिल्लोडमार्गे मध्य प्रदेशात जाण्याचा बेत या कामगारांनी आखला होता.
हे वाचले का? - बामुतील पदव्युत्तरच्या परीक्षा पुढे ढकलल्या
शाळेत केली होती व्यवस्था
पाल फाटा परिसरात या मजुरांना प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी अडविले. त्यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी डॉ.अशोक दांडगे, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्ना भाले, पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी सदरील मजुरांना थांबविण्याचा सल्ला देऊन त्यांची पाल फाटा येथील खासगी इंग्रजी शाळेत व्यवस्था केली होती. या कामगारांसाठी भाजपच्या वतीने नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी जेवणाची व्यवस्था केली होती. मात्र, या कामगारांनी सुरवातीला हो म्हणून सायंकाळच्या जेवणानंतर तेथून प्रशासनाला गुंगारा देऊन पुन्हा मध्य प्रदेशाची वाट धरली असल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनाअभावी कामगारांनी पलायन केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
मध्य प्रदेशातून पायी आलेल्या कामगारांसाठी जेवण्याची व्यवस्था केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने करण्यात आली होती; पण आता हे कामगारच तेथे नाहीत.
सुहास शिरसाठ, नगराध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष भाजप फुलंब्री
वाळूज येथून पायी जाणाऱ्या मध्य प्रदेशातील कामगारांची व्यवस्था पाल फाटा येथील शाळेत करण्यात आली होती. तसेच नगरपंचायतीच्या माध्यमातून त्यांची जेवणाची व्यवस्था करण्याचे सांगितले होते; परंतु सदरील कामगारांची राहण्याची मानसिकता नसल्याने रात्रीच ते निघून गेले.
सुरेंद्र देशमुख, तहसीलदार फुलंब्री
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.