औरंगाबाद : संभाजी महाराजांचा गौरव करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे नामकरण संभाजीनगर करण्यात यावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादनासाठी प्रा. कवाडे औरंगाबादेत दाखल झाले होते. शहर नामांतराचा विषय चांगलाच गाजत आहेत. याविषयी प्रा. कवाडे यांना भूमिका विचारली असता ते म्हणाले, की औरंगाबादचे नाव बदलू नये, त्याऐवजी पुणे जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करण्यात यावे. पुण्यातील वढू बुद्रुक गावात छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. दलित समाजावर अन्याय, अत्याचार होत आहे. यामुळे आता पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे २६ जानेवारीपासून 'आत्मनिर्भर, अत्याचार प्रतिकार अभियान' राबविण्यात येणार असल्याचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले. गावागावात जाऊन प्रबोधन करण्यात येणार आहे. आठवले वारंवार संविधानाचा अपमान करतात.
केंद्र सरकारच्या तीन कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. हे तीन कायदे करण्याअगोदर एका मोठ्या उद्योजकासोबत केंद्र सरकारची बैठक झाली. त्यानंतर त्या उद्योजकांनी पानिपत येथे शंभर एकरांवर गोदाम सुरू केले. हे तिन्ही काळे कायदे रद्द करावेत. याच कायद्याचे समर्थन करणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे वारंवार संविधानाचा अपमान करीत आहेत. संविधान नष्ट करू पाहणाऱ्यांचे समर्थन करणारे रामदास आठवले हे संविधानवादी आहेत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच वंचित आघाडी म्हणजे संधिसाधूंचा पक्ष आहे. तर जाती टिकवून ठेवण्यासाठी भारतीय बौद्ध महासंघ काम करीत असल्याचा आरोपही कवाडे यांनी केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.