दोघा भावांनी तयार केले पाणीपुरीचे एटीएम! स्वच्छता, मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठीचे नवीन स्टार्टअप

Sameer And Pratik Pitale
Sameer And Pratik Pitale

औरंगाबाद : चटपटीत खाद्य असलेली पाणीपुरी सर्वांच्या आवडीची आहे. अनेकदा पाणीपुरी अस्वच्छतेमुळे आजारालाही आमंत्रण देत असते. यामुळेच स्वच्छता असलेल्यांकडेच खवय्ये पाणीपुरी खात असतात. अशांची स्वच्छता बाळगत मानवी हस्तक्षेप टाळत बी. टेक. झालेले समीर व प्रतीक पितळे यांनी पाणीपुरीचे एटीएम मशीन तयार केले आहे. सेन्सरयुक्त असलेले हे नवीन यंत्र सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे.

खवय्यांना नेहमीच पडणारा अस्वच्छतेचा प्रश्‍नही त्यांनी सोडविला आहे. अशा स्वरूपाचे देशातील हे पहिलेच यंत्र असल्याचा दावाही या दोघा बंधूंनी केला आहे.
गेल्या वर्षी समीर पितळे यांनी पाणीपुरी खाल्ल्यानंतर ते आजारी पडले होते. यात सोनोग्राफी केल्यानंतर केवळ पाणीपुरी खाल्ल्याने आजारी पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. केवळ अस्वच्छ असलेल्या पाणीपुरीमुळे हे झाले. यामुळे मानवी हस्तक्षेप नसलेले स्वयंचलित पाणीपुरी यंत्र तयार करता येईल का? असा विचार करीत त्याअनुषंगाने कामही सुरू केले.

यासाठी समीरने वेगवेगळ्या कंपनीत काम करून जमा केलेल्या पैशातून या कल्पनेवर काम करणे सुरू केले. यात प्रतीकची मदत घेतली. या यंत्रासाठी लागणाऱ्या पंपचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते चायनीज होते. मनासारखा न मिळाल्याने त्यांनी पंपही डिझाईन तयार करीत घरीच तयार केला. याला लागणारा सर्किट बोर्ड डिझाईन केला. अशा पद्धतीने दोन यंत्र तयार केले. मात्र तेही मनाजोगते न झाल्याने त्यांनी दोन यंत्रांचा अनुभव गाठीशी सोबत ठेवत नवे सेन्सर मशीन तयार केले आहे. यासाठी त्यांना ६० हजार रुपये खर्च आला. हे यंत्र तयार करताना घरच्यांची अनेकवेळा बोलणीही खाल्ल्याचे समीरने सांगितले. या यंत्राला सोलापूर, धुळे, रत्नागिरी, औरंगाबाद शहरांतून मागणी होत आहे. यातील एक ते दोन यंत्रांचे कामही ‘फ्रेजिमो’ या कंपनीच्या माध्यमातून सुरू केले असल्याचे समीरने सांगितले.

असे आहे पाणीपुरीचे एटीएम
या मशीनच्या माध्यमातून पाणीपुरी खाणाऱ्या ग्राहकाला पैसे दिल्यानंतर या मशीनमध्ये आवडीनुसार फ्लेव्हर निवडता येतो. यासाठी गोड व तिखट अशा स्वरूपाचे सेन्सर लावण्यात आले आहेत. ग्राहकाला आवडीच्या फ्लेव्हरसमोरील सेन्सर सिलेक्ट करावे लागतात. त्यानंतर पाणीपुरीचा आस्वाद घेता येतो. यासह या यंत्रातून दिवसभरात किती प्लेट पाणीपुरी विक्री होते, याचीही नोंद होते. हे पाणीपुरी यंत्र बॅटरीवर चालते. एकदा चार्ज केल्यावर ३०० प्लेटपर्यंत चालते. यासाठी ०.२ युनिट इतकीच वीज लागते. तीनशे प्लेटसाठी केवळ दोन रुपये खर्च येतो. शिवाय पार्सलसाठीही स्वतंत्र सुविधा देण्यात आलेली आहे, असेही समीरने सांगितले.


आम्ही नेहमीच वेगवेगळे प्रयोग करीत असतो. शेतीसाठी एक डिव्हाईस तयार केले होते. जमिनीचे तापमान, आर्द्रता तपासणे, पाण्याचा पंप ऑटोमॅटिक सुरू करता येणारे हे डिव्हाईस होते. त्यानंतर मी प्रतीकच्या मदतीने पाणीपुरी यंत्र तयार केले. भविष्यात एक ते तीन अथवा पाच नोजल असलेले यंत्रही तयार करणार आहे. याचे कामही सुरू केले आहे.
- समीर पितळे, पाणीपुरी यंत्र निर्माता
 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com