कोरोनाचा आणि तुमच्या वर्तनाचा संबंध आहे थेट सूर्यावरच्या डागांशी

Aurangabad News
Aurangabad News

कन्नड (औरंगाबाद) : सूर्यावरचे डाग आणि हालचालींचा पृथ्वीवरील मानवी जीवनावर आणि वर्तनावर परिणाम होत असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या सौर डागांच्या हालचाली मंद आहेत, अशा काळात पृथ्वीवर विषाणूजन्य संसर्गाचा प्रादुर्भाव, म्हणजेच कोरोना व सार्सचा प्रादुर्भाव सुरू असून नजीकच्या भविष्यात सौर डागांच्या हालचालींची वाढ होणार असून, प्रगतीचा काळ लवकरच सुरू होणार असल्याचे कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.युसूफ हनिफ शेख यांनी म्हटले आहे.

डॉ.शेख हे सौर डागांच्या हालचाली व पृथ्वीवरील मानवी वर्तन यासंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास करत आहेत. सौर डागांच्या हालचालींमध्ये सातत्याने बदल होत असतात. दर अकरा वर्षांनी या हालचालींची पुनरावृत्ती होते. म्हणजे सौर डागांच्या हालचालींचे एक चक्र अकरा वर्षांनी पूर्ण होते. त्यानुसार पृथ्वीवरील मानवी जीवनावर व वर्तनावर परिणाम होतो.

हा त्यांच्या अभ्यासाचा प्रमुख विषय असून, त्या संदर्भात त्यांनी अकरा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर 'फ्रॅक्टल' नियतकालिकेत शोधनिबंध सदर केला होता. त्या शोध निबंधातच डॉ.युसूफ यांनी अकरा वर्षानंतर म्हणजे आता, कमी सौर डाग हालचालींच्या काळात विषाणूजन्य संसर्गाचा पृथ्वीवर प्रादुर्भाव होणार असल्याचे भाकीत केले होते.

या संदर्भात सविस्तर माहिती देतांना ते म्हणाले की, सूर्याच्या पृष्ठभागावरील चुंबकीय क्षेत्रास सौर डाग म्हणतात. सौर डागांचे क्षेत्र हे उच्च चुंबकीय क्षेत्र असलेला भाग असतो. असे चुंबकीय क्षेत्र म्हणजेच सौर डाग सूर्याचे त्या ठिकाणचे तापमान कमी करण्यास कारणीभूत ठरतात. या डागांची हालचाल कमी व जास्त होत असते. सर्वात कमी कडून, सर्वात जास्त हालचालींचे एक चक्र पूर्ण होण्यासाठी अकरा वर्षे लागतात. सध्या चोविसावी सायकल सुरू असून सौर डागांच्या कमी हालचालींचा भाग सुरू आहे.

ही पूर्ण सायकल चार भागात विभागली आहे.

  • सर्वात कमी सौर डाग हालचाल असल्यास हा काळ मंदीचा, दडपणाचा व रेंगाळणारा काळ असतो. मानवाला जगण्याची ऊर्जा मिळत नाही, पेशींची कार्यक्षमता कमी होते, प्रतिकार शक्ती कमी होते, साथीचे रोग पसरतात. सध्या ही सायकल सुरू असून त्यात कोरोना व सार्सचा संसर्ग झालेला आहे.
  • दुसरा भाग वाढती सौर डाग हालचाल असून या काळात नवनवे नेतृत्व, नवीन कल्पना उदयास येतात, आव्हाने स्वीकारण्याची मनस्थिती बनते, हा काळ प्रगतीचा असतो. हा काळ लवकरच सुरू होणार असल्याचे डॉ.युसूफ यांनी सांगितले आहे.
  • तिसरा भाग जास्त सौर डाग हालचालींचा असून या काळात मानवीय संवेदना तीव्र असतात. या काळात निदर्शने, दंगे, क्रांती, युद्धे होतात. हृदयरोगी व मनोरुग्णांची संख्या वाढते, रस्त्यावरील अपघातांची संख्या वाढते.
  • चौथा भाग कमी होत असलेल्या सौर डाग हालचालींचा असून या काळात मानवी संवेदना कमी होतात. हा काळ शांततेचा असून या काळात संशोधक व शांतीचे पुरस्कर्ते जन्म घेतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com