नांदेडमध्ये २५ हजार कर्जखाते ‘निराधार’

NND22KJP01.jpg
NND22KJP01.jpg

नांदेड : महाआघाडी सरकारच्या महात्मा जोतीराव फुले कृषी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील दोन लाख थकबाकीदार शेतकरी पात्र ठरले ठरले आहेत. संपूर्ण आधारलिंक खात्याशी संबधीत असलेल्या या योजनेत एक लाख ८१ हजार खाते आधारलिंक झाले आहेत. तर अद्याप पंचवीस हजार कर्जखाती आधारलिंक करणे शिल्लक आहे. यात सर्वाधिक १६ हजार कर्जखाते भारतीय स्टेट बॅंकेचे आहेत.

आधारलिंकसाठी विशेष मोहिम
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी संपूर्णत: आधार क्रमांक जोडलेल्या बँक खात्याशी संबंधित आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी बँकेमधील आपले कर्जखाते आधार क्रमांकाशी जोडलेले असल्याची खात्री करावी. ज्या शेतकऱ्यांचे बँक कर्जखाते आधार क्रमांकाशी संलग्न नाहीत, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बँकेशी संपर्क करुन आपले आधार क्रमांक बँक खात्याशी जोडून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले होते. त्यानुसार जिल्ह्यात ता. १४ व ता. १५ जानेवारी रोजी कॅंप घेवून कर्जखाते आधारलिंक करण्याची मोहीम राबविण्यात आली होती.

दोन लाख सहा हजार शेतकरी पात्र
या योजनेतंर्गत जिल्ह्यात पिककर्जाची दोन लाखापर्यंत थकलेली रक्कम असलेले दोन लाख सहा हजार ८१४ शेतकरी पात्र ठरले आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे १९ हजार ४१९ तर इतर व्यापारी व राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या एक लाख ८७ हजार ३९५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यातील २५ हजार ४४८ कर्जखाते अद्याप आधार जोडणे शिल्लक आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे एक हजार १८८ तर इतर बॅंकांचे २४ हजार २६० शेतकऱ्यांचा समावेश आहे. शिल्लक शेतकऱ्यांत सर्वाधिक भारतीय स्टेट बॅंकेचे शेतकरी असल्याची माहिती मिळाली. याबाबत जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रविण फडणीस तसेच जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक गणेश पठारे हे शिल्लक खाते आधारलिंक करण्यासाठी बॅंक स्तरावर पाठपुरावा करत आहेत.

कशी आहे कर्जमुक्ती योजना?
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ज्या शेतकऱ्यांकडील ता. एक एप्रिल २०१५ ते ता. ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ता. ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकलेली रक्कम दोन लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांचे अल्प, अत्यल्प भूधारक या प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात दोन लाखापर्यंत पर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
या सोबतच ता. एक एप्रिल २०१५ ते ता. ३१ मार्च २०१९ पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे, पुर्नगठन करुन मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात ता. ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम दोन लाखापर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल.

आजपर्यंतच्या माहितीनुसार जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार ८१४ शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत. यातील एक लाख ८१ हजार ३६६ कर्जखाते आधारलिंक झाले आहेत. यातील २५ हजार ४४८ कर्जखात्यांना आधारलिंक करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होइल.
- प्रविण फडणीस
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com