नांदेडला ‘एवढ्या’ कोटींचा खरीप पिकविमा मंजूर

NND01KJP01.jpg
NND01KJP01.jpg

नांदेड : खरीप हंगाम २०१९ - २०२० मध्ये प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सोयाबीन, ज्वारी व उडीद या पिकांसाठी पिकविमा भरलेल्या सहा लाख तीस हजार शेतकऱ्यांना ३१३ कोटी ६९ लाख रूपयांचा विमा परतावा मंजूर झाला आहे. या विम्यात कपाशी तसेच तुरीचे संकलन बाकी असल्याने त्यांचा समावेश नाही. चार लाख १३ हजार हेक्टरवरील पिकांसाठी मंजूर झालेल्या विम्याची जोखीम किती टक्के आहे, याची माहिती मिळू शकली नाही. विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

१२ लाख पाच हजार अर्जदारांनी  विमा भरला
खरीप हंगाम २०१९ - २०२० मध्ये जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात आली होती. यात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद व मुग या सहा पिकांसाठी १२ लाख पाच हजार अर्जदारांनी पाच लाख ८७ हजार हेक्टरवरील पीकविम्यापोटी ५० कोटी रुपयांचा विमा भरला होता. हा विमा दोन हजार २४२ कोटी संरक्षित रकमेसाठी भरला होता. यंदाचे कमी - अधिक पर्जन्यमान तसेच अतिवृष्टीत पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे अंतिम आणेवारी पन्नास पैशाच्या आत आली आहे. अशा परिस्थितीत हप्ताधारक शेतकरी पीकविमा मंजुरीच्या प्रतीक्षेत होते.

प्रधानमंत्री पिकविमा योजना
पिकांना विम्याचे संरक्षण देण्यासाठी शासनाने ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीकडून अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविली. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक, तर बिगर कर्जदारांना ऐच्छिक होती. यात वास्तवदर्शी विमा हप्ता आकारून खरीप पिकांसाठी दोन टक्के, तर कापसासाठी पाच टक्के हप्ता ठेवण्यात आला होता. या योजनेत सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के निश्‍चित करण्यात आला होता.
यात सहभागी होण्यासाठी ता. ३१ जुलै २०१९ ही अंतिम तारीख निश्‍चित करण्यात आली होती. यानंतर पाच आॅगष्टपर्यंत यात वाढ दिल्यामुळे मागील दोन वर्षांच्या तुलनेत खरीप हंगाम २०१९ - २०२० मध्ये सर्वाधिक १२ लाख पाच हजार ३५ अर्जदारांनी सहभाग घेऊन विमा हप्त्यापोटी ४९ कोटी ९५ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. या विमा हप्त्यातून पाच ८७ हजार ७७ हेक्टरवरील पिकांसाठी पीकविमा भरला आहे. यातून दोन हजार २४२ कोटी ६१ लाख ४६ हजार ३४१ रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित केली होती.

पावसाचा खंड आणि अतिवृष्टीही 
यंदा पावसाच्या पाच महिन्यांत वार्षिक सरासरीच्या एक हजार १३ मिलिमीटरनुसार १०६ टक्के पावसाची नोंद झाली. पावसाचे प्रमाण चांगले असले तरी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवस पावसाचा खंड पडला. यामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. तसेच काही ठिकाणी पेरणीला विलंब झाला होता. 

चक्रीवादळाने नुकसान
जिल्ह्यात ‘क्यार’ व ‘महा’चक्री वादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक अशा एकूण सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. यात सात लाख १८ हजार ४३६ शेतकरी बाधीत झाले होते.
परिणामी यंदा ता. १५ डिसेंबर रोजी सर्वच तालुक्यांतील एक हजार ५६२ गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले होते. यामुळे पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या बारा लाख पाच हजार अर्जदारांना विमा मंजुरीची प्रतीक्षा होती.

३१३ कोटी ६९ लाखांचा विमा परतावा मंजूर
मागील हंगामात पाच पिकांसाठी १२ लाख पाच हजार ३५ अर्जदारांनी सहभाग घेऊन विमा हप्त्यापोटी ४९ कोटी ९५ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. या विमा हप्त्यातून पाच लाख ८७ हजार ७७ हेक्टरवरील पिकांसाठी पीकविमा भरला आहे. यातून दोन हजार २४२ कोटी ६१ लाख ४६ हजार ३४१ रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित केली होती. 

सोयाबीन, उडीद ज्वारीचा परतावा मंजूर
यापैकी सोयाबीन, ज्वारी व उडीद या पिकांसाठी पिकविमा भरलेल्या सहा लाख तीस हजार ९५७ शेतकऱ्यांना ३१३ कोटी ६९ लाख रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला आहे. यात कपाशी तसेच तुरीचे संकलन बाकी असल्याने त्यांचा समावेश नाही. चार लाख १३ हजार २५८ हेक्टरवरील पिकांसाठी परतावा मंजूर झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. यात विम्याची जोखीम किती टक्के मंजूर झाली, याची माहिती मात्र मिळू शकली नाही. विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. पुढील आठवड्यात सर्वच शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळतील, अशी माहिती विमा कंपनीच्या सूत्रांनी दिली.

पीक, शेतकरीनिहाय मंजूर विमा रक्कम
(क्षेत्र हेक्टरमध्ये, रक्कम कोटीत)
पिक............शेतकरी........लागवड क्षेत्र.....रक्कम
सोयाबीन.....५,१५,५७४.....३,८३,५५०....२९७.७७
ज्वारी.........७५,८६९.......२१,४४०.........१४.१५
उडीद.........२१,२४७.........३,८४१...........१.५३

तालुकानिहाय शेतकरी व मंजूर विमा रक्कम
तालुका.........शेतकरी..........मंजूर रक्कम
अर्धापूर........१९,१७८.........१५.१६ कोटी
भोकर..........५४,४५६.........१२.८४ कोटी
बिलोली........३१,०७२.........२३.८१ कोटी
देगलूर..........४०,९९६.........२४.४० कोटी
धर्माबाद........१६,१२१.........१३.०१ कोटी
हदगाव..........७१,७४०.........५१.१४ कोटी
हिमायतनगर.....२०,३०४.........०९.७२ कोटी
कंधार............७७,९०३.........२२.०७ कोटी
किनवट..........१४,९५२.........४.३९ कोटी
लोहा.............६८,३७९.........३२.८४ कोटी
माहूर.............१२,३४१.........०४.२८ कोटी
मुदखेड...........१९,७२५.........१४.४७ कोटी
मुखेड.............७४,५१३.........२०.७४ कोटी
नायगाव...........५१,८५४.........२६.४४ कोटी
नांदेड..............३१,३३३.........३०.८७ कोटी
उमरी..............२६,०९०.........०७.४३ कोटी
एकूण...........६,३०,९५७.......३१३.६९ कोटी


शेतकऱ्यांना दिलासा
प्रधानमंत्री पिकविमा योजनेत जिल्ह्यातील सोयाबीन, ज्वारी व उडीदासाठी भरलेल्या सहा लाख ३० हजार शेतकऱ्यांना ३१३ कोटी ६९ लाखांचा विमा मंजूर झाला आहे. कपाशी तसेच तुर या पिकाचे संकलन बाकी असल्याने यात त्या पिकांचा समावेश नाही. मंजूर विम्यात जवळपास सर्वच सोयाबीन उत्पादकांचा समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
रविशंकर चलवदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com