जालना - जिल्हाभरात गेल्या साडेचार वर्षांत राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दोन लाखांहून अधिक जणांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी शंभरावर एड्सग्रस्त आढळत आहेत. विशेष म्हणजे यावर्षी तब्बल 107 जण एड्सबाधित असल्याचे समोर आले आहे.
गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यात एचआयव्ही-एड्सची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. मात्र, दरवर्षी रुग्णांचे प्रमाण शंभराच्या खाली आलेले नाही. नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये असुरक्षित शारीरिक संबंध हे प्रमुख कारण ठरत आहे. अनेकांच्या बाहेरख्यालीपणाची किंमत त्यांच्या पत्नी तसेच होणाऱ्या बाळाला चुकवावी लागत आहे.
एआरटी केंद्राद्वारे नियमित उपचार
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत वर्ष 2015 ते 2019 पर्यंत जिल्ह्यातील दोन लाख 35 हजार जणांची तपासणी करण्यात आली. यात 877 जणांना एड्सचे निदान झाले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील एआरटी केंद्राद्वारे 1084 पुरुष, 1037 महिला, तीन तृतीयपंथी आणि 177 मुला-मुलींवर नियमित उपचार करण्यात येत आहेत. एड्सबाधित व्यक्तीचे रक्त चढविले जाऊ नये यासाठी योग्य तपासणी करूनच रक्तपेढीतून रक्ताचे वितरण केले जात आहे. तसेच एड्सग्रस्त असलेल्या महिलेच्या बाळाला या रोगाचा संसर्ग होण्यापासून वाचविण्याच्या प्रयत्नाला एआरटी सेंटरला मोठ्या प्रमाणात यश येत आहे. वापरलेल्या इंजेक्शनचा पुनर्वापर होऊ नये या दृष्टीनेही काळजी घेतली जात आहे. त्यामुळे एड्स आटोक्यात येण्यास मदत मिळत आहे.
हेही वाचा : टमरेलबहाद्दर अंधारात पडताहेत बाहेर...
एड्स असाध्य, पण बचाव गरजेचा
एचआयव्ही-एड्स हा असाध्य असला तरी त्यापासून बचाव करणे शक्य आहे. ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसमुळे (एचआयव्ही) या रोगाची लागण होते. त्यामुळे शरीराच्या प्रतिकारक्षमतेवर परिणाम होतो. प्रौढांमध्ये सरासरी संसर्गाच्या 7 ते 10 वर्षांनंतर या रोगाची लक्षणे दिसून येतात. तर तरुणांवर तीव्रतेने याचे परिणाम दिसून येतात. या रोगाची लागण होऊनही दीर्घ आयुष्यापर्यंत जगता येणे शक्य आहे. यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी एआरटी सेंटर ऍन्टी रेट्रो व्हायरल थेरपी स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राद्वारे दिल्या जाणाऱ्या नियमित औषधांमुळे अशा रुग्णांना दीर्घकाळासाठी आरोग्यमय जीवन जगण्यास मदत होत आहे.
एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये आणि जोखीमग्रस्त भागात जनजागृती करून दोन लाखांहून अधिक जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात आढळून आलेल्या रुग्णांना असुरक्षित शारीरिक संबंधामुळे या रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एड्सच्या बचावासाठी विवाहबाह्य, असुरक्षित संबंध टाळणे महत्त्वाचे आहे.
- राजेंद्र गायकवाड,
जिल्हा कार्यक्रम अधिकारी
वर्ष | आढळलेले एड्सबाधित |
2015-16 | 204 |
2016-17 | 203 |
2017-18 | 175 |
2018-19 : | 188 |
2019 (एप्रिल ते ऑक्टोबर) | 107 |
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.