पालकमंत्री अमित देशमुखांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा, कामे वेळेवर करण्याचे दिले आदेश

Amit Deshmukh News
Amit Deshmukh News

लातूर :  महावितरणच्या मनमानी आणि बेफिकीर कारभाराबद्दल पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. रोहित्र बंद पडणे, त्यांची दुरुस्ती लवकर न होणे, दुरूस्त रोहित्र पुन्हा बंद पडणे, अखंडित वीजपुरवठा आदी प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यामुळे सोमवारी (ता. २५) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. सुरळीत वीज पुरवठ्याचा आराखडा तयार करा, वीज वाहिनीच्या दुरुस्तीसाठी तातडीने विशेष मोहीम राबवा असे आदेश त्यांनी दिले.

यावेळी पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग, साहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी उपस्थित होते. पालकमंत्री देशमुख म्हणाले, वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल.

रोहित्रांची तातडीने दुरूस्ती करून पुढील दोन महिन्यात वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यंदा दुरूस्त केलेल्या रोहित्रांची संख्या तसेच नादुरूस्त रोहित्र वेळेत दुरुस्त करूनही पुन्हा नादुरुस्त झालेल्या रोहित्रांचा लेखी अहवाल सादर करावा असे त्यांनी बजावले. ग्रामीण भागातील वीज वाहिनींच्या दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबवावी असे त्यांनी सांगितले. जलजीवन मिशनमधून ग्रामीण भागात प्रत्येक घराला नळजोडणी देण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितले. या वेळी चालू वार्षिक योजनेचा शंभर टक्के निधी खर्च करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले. येत्या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या ३२१ कोटी ४ लाख २९ हजार रुपयांच्या प्रारूप आराखड्याला या वेळी मान्यता देण्यात आली.

जळगाव पॅटर्न लातुरात
जिल्हा नियोजन समितीच्या निधीशी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेसोबत सांगड घालून जळगाव जिल्ह्यात शाळा, ग्रामपंचायती व अंगणवाडी इमारतींसह संरक्षक भितींचे बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले आहे. या जळगाव पॅटर्नची माहिती घेऊन जिल्ह्यात हा पॅटर्न कशा पद्धतीने राबवणे शक्य आहे, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले.

लोकप्रतिनिधींच्या मागण्या
राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने करावे, रोहित्रांची तातडीने दुरुस्ती करावी, पाणीपुरवठा योजनांसाठी सौर ऊर्जा प्रकल्पाचे नियोजन करावे, पाणंद रस्त्यासाठी निधी द्यावा, निलंग्याच्या अभ्यास केंद्रासाठी निधी द्यावा आदी मागण्या लोकप्रतिनिधींनी करत विविध प्रश्न उपस्थित केले.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com