पुण्यात फसलेल्या कुटुंबाला अशोक चव्हाण यांनी दिला आधार

ashok chavan photo.jpg
ashok chavan photo.jpg
Updated on

नांदेड : रोजगाराच्या शोधात पुण्यात गेलेल्या आणि टाळेबंदीमुळे बेघर होऊन उपासमारीची वेळ ओढवलेल्या नांदेडच्या एका कामगार कुटुंबाची व्यथा कळताच पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी तातडीने पावले उचलत त्यांना सुरक्षित ठिकाणी आधार देण्याचे काम केले आहे.

वसरणीचे कुटूंब अडकले पुण्यात 
पत्रकारिता आणि लोकप्रतिनिधी दोघांनीही सजगता दाखवली तर सर्वसामान्यांना कसा तात्काळ न्याय मिळू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे बोलले जाते आहे. जय महाराष्ट्र न्यूज या मराठी वृत्तवाहिनीने काल हे वृत्त दाखवले. वसरणी (ता. नांदेड) येथील वडरवाडा परिसरात राहणारे रेड्डी लक्ष्मण तांबेकर हे दोन महिन्यांपूर्वी पत्नी आणि दोन लहान मुलांसमवेत कामाच्या शोधासाठी पुण्याला गेले होते. त्यांना एका ठिकाणी ट्रॅक्टर चालवण्याचे कामही मिळाले. मात्र देशात संचारबंदी जाहीर झाल्यानंतर त्यांचा रोजगार आणि निवारा हिरावला गेला. त्यातच हाताशी पैसा शिल्लक नसल्यामुळे या कामगाराच्या कुटुंबावर लहान-लहान मुलांसमवेत अक्षरशः उपाशी राहण्याची वेळ ओढवली.

इलेक्ट्रानिक माध्यमामुळे बाब आली पुढे 
हताश झालेले हे कुटूंब मदतीसाठी पुण्यात भटकत असताना शुक्रवारी त्यांची जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याशी भेट झाली. एका पत्रकाराचे कर्तव्य म्हणून धर्माधिकारी यांनी या कुटुंबांच्या अडचणींवर बातमी तर केलीच; सोबतच एक संवेदनशील व जबाबदार नागरिक म्हणून स्थानिक पोलिसांच्या मदतीने या कुटुंबाला राहण्यासाठी एक भाड्याची खोली करून दिली. त्या खोलीचा भाडेखर्च त्यांनी स्वतःच्या खिशातून केला. एवढेच नव्हे तर मित्रांच्या सहकार्याने या कुटुंबाची रात्रीच्या जेवणाचीही सोय करून दिली.

पालकमंत्र्यांनी केली व्यवस्था
दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा ही बातमी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बघितली. त्यानंतर त्यांनी तातडीने आपल्या कार्यालयामार्फत अमोल धर्माधिकारी यांच्याशी संपर्क साधला व या कुटुंबाची विस्तृत माहिती घेतली. शनिवारी सकाळी रेड्डी लक्ष्मण तांबेकर यांच्याशी फोनवरून संपर्क करण्यात आला आणि पुढील तासाभरात शासनाचे कर्मचारी त्यांच्यापर्यंत पोहोचले. आता हे कुटूंब पुणे येथील शासकीय विश्रामगृहात सुरक्षित असून, टाळेबंदी संपेपर्यंत त्यांच्या निवासाची व भोजनाची सोय करण्यात आली आहे.

सजक पालकमंंत्र्यामुळे अनेकांना मदत
पालकमंत्री अशोक चव्हाण यांची ही सजगता यापूर्वीही अनेकदा दिसून आली आहे. कोरोनामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मॉरिशस, युक्रेनसारख्या जगाच्या कानाकोपऱ्यात अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांनी सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या १८ मार्चपासून ते नांदेड जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहेत. साधारणतः दररोज जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत त्यांच्या बैठका सुरू असून, निर्णयांच्या आणि उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ग्रामीण भागातही या उपाययोजनांची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी, यासाठी त्यांनी तालुक्यांचे दौरे देखील सुरू केले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com