अन्नधान्याच्या वाटपाकडे ठेवावे लागणार लक्ष

file photo
file photo

नांदेड - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु असलेला लॉकडाऊन आता ता. ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड शहर आणि जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, असे असले तरी गोरगरिब आणि गरजूंच्या घरापर्यंत अन्नधान्य पोहचते की नाही? याकडे देखील जिल्हा प्रशासनाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कारण काही जण गोरगरिबांच्या मापात पाप करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शहर आणि जिल्ह्यातील कोणताही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने रेशन धान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याचबरोबर विविध सेवाभावी संस्था, संघटना तसेच पक्ष आणि दानशूर व्यक्ती देखील मदत करत आहेत. मात्र, ही मदत गोरगरिब, गरजू आणि वंचितापर्यंत जाण्यासाठी विशेष उपाययोजना आणि प्रयत्न करावे लागणार आहेत. 

एवढे मिळणार धान्य
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतंर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे २१ लाख आहे. या लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानाद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जाणार आहे. बीपीएल कार्डधारक असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेतंर्गत दोन रुपये किलो दराने प्रती कार्ड १५ किलो गहू आणि तीन रुपये किलो दराने प्रति कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रुपये दराने एक किलो साखर दिली जाते. तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना व एपीएल शेतकरी पात्र लाभार्थ्यांना दोन रुपये किलो दराने प्रती व्यक्ती तीन किलो गहू आणि तीन रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती दोन किलो तांदूळ दिला जातो. 

आत्तापर्यंत एवढे झाले वाटप
नांदेड जिल्ह्यात या सर्व योजनेतून सुमारे ३३ हजार ७१९.८५ क्विंटल गहू आणि २१ हजार २९०.११ क्विंटल तांदूळ तसेच २०१.०६ क्विंटल साखरेचे वाटप झाले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतू लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे सहा हजार ३५२ शिधापत्रिकाधारकांनी जे जेथे राहत आहेत त्या ठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेतंर्गत आनलाइन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रति लाभार्थी प्रति महिने पाच किलो तांदूळ मोफत देण्याची केंद्र शासनाची सूचना आहे. त्यानुसार रेशनकार्ड धारकाने नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ सोमवारपासून (ता. १३ एप्रिल) कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जूनमध्ये सुद्धा त्या त्या महिन्यात उपलब्ध करुन दिले जाणार आहे. 


फोटोसेशनपुरती मदत नको
समाजातील काही दानशूर व्यक्ती गरजू व गोरगरिबांसाठी मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. त्याचबरोबर काही स्वयंसेवी संस्था, संघटना आणि विविध पक्षांचे पदाधिकारी देखील मदत करत आहेत. पण ही मदत करताना ती फक्त फोटोसेशनपुरती मर्यादित राहता कामा नये. प्रत्येकाला मदत मिळेल, अशी व्यवस्था व्हायला हवी. कारण मागील काही दिवसात एकाच कुटुंबातील पाच पाच व्यक्ती मदत घेऊन जाताना दिसत आहेत तर खऱ्या अर्थाने जो वंचित आणि गरिब आहे त्याला मात्र काहीच मदत मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा वंचितांसाठी मदतीचा हात पुढे आला पाहिजे, ही अपेक्षा.


...तर होऊ शकते शिक्षा
नांदेड शहर आणि जिल्ह्यात जीवनावश्‍यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. त्यामुळे वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी शासकीय यंत्रणा खबरदारी घेत आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होऊ शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलिस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
- शरद मंडलीक, जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com