औरंगाबाद - आगामी काळात विविध विमान कंपन्यांकडे तब्बल नऊशे विमाने दाखल होत असल्याने विमानक्षेत्र विस्तारीकरणाला चालना मिळणार आहे. येत्या पाच वर्षांत औरंगाबाद विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू होईल, असा विश्वास विमानतळ प्राधिकरणाचे पश्चिम विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक केशव शर्मा यांनी व्यक्त केला.
चिकलठाणा विमानतळावर उभारलेल्या शंभर फूट उंचीच्या ध्वजवंदन कार्यक्रमासाठी शर्मा येथे आले होते. पत्रकारांशी झालेल्या चर्चेत विमानक्षेत्र विस्तारीकरणात विमानांच्या संख्येचा अडसर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शर्मा म्हणाले, सध्या देशात केवळ 476 विमाने आहेत. ही संख्या तोकडी असल्याने नवीन विमान सुरू करणे, ही बाब कंपन्यांसाठी अवघड आहे. असे असले तरीही येत्या काळात विविध कंपन्यांकडे नऊशे विमाने दाखल होणार आहेत. त्यामुळे निश्चितच विस्तारीकरण होईल.
हेलिकॉप्टर सेवेला हवे प्राधान्य
एव्हिएशन पॉलिसी तयार करणारा महाराष्ट्र हे देशभरातील पहिले राज्य होते. मात्र, सध्या पॉलिसीचा विचार महाराष्ट्र सरकारकडून होत नाही. त्यामुळे गुजरात राज्याने वाढत्या विमानसेवेमध्ये बाजी मारली आहे. औरंगाबादहून पर्यटनासाठी किंवा एका शहरातून दुसऱ्या शहराला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचाही पर्याय चांगला आहे. यामुळे औरंगाबाद ते अजिंठा, वेरूळ, शिर्डी, नाशिक, जळगाव अशी सेवा सुरू करता येऊ शकते. मात्र, कंपन्या यासाठी पुढाकार घेत नाहीत, अशी खंतही शर्मा यांनी व्यक्त केली.
|