फडणवीसांना अहंकार नडला; पहा कोण म्हणतंय? 

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद - राज्यात मुख्यमंत्रिपद, सरकार स्थापन करण्याच्या प्रश्‍नावर राजकीय कलगीतुरा रंगला असला तरी शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटायला हवेत. प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेला अहंकारच त्यांना नडला आहे. नको तेवढ्या प्रमाणात आयारामांना संधी दिली. त्यामुळे अन्य पक्षांनी त्यांना घेरलेय, अशा शब्दांत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी टीकास्त्र सोडले. नव्याने स्थापन होणाऱ्या सत्तेच्या केंद्रस्थानी श्री. पवार असल्याने त्यांच्याकडून शेतीबद्दल मोठ्या अपेक्षा असल्याचेही प्रा. देसरडा यांनी स्पष्ट केले.

राज्यात सध्या अत्यंत अभूतपूर्व अशी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थिती निर्माण झालेली आहे. विशेषत: शेतीविषयक स्थिती तर अत्यंत चिंताजनक आहे. आधी दीर्घकाळ उघडिपीनंतर सातत्याचा परतीचा पाऊस, यातून जे पीक वाचवले ते सर्व मातीमोल झाल्याने या भयावह स्थितीला गांभीर्याने घ्यावे, अशी सूचना अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी राज्यपाल यांच्याकडे केली आहे. 

राज्यात शेतीसंबंधी अभूतपूर्व चिंताजनक स्थिती

याबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी (ता. 15) आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. देसरडा म्हणाले, की पिकांच्या नुकसानीबद्दल आपण राज्यपालांना निवेदन पाठविले असून, संबंधित विषय गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे. पिकांच्या नुकसानीमुळे चांद्यापासून ते बांद्यापर्यंत संबंध शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू असून याचे समाजाला काहीही वाटत नाही, ही चिंतेची बाब आहे. इतरांच्या वेदनेची संवेदना नसल्याने माणूसपण हरवलेले दिसतेय. यातून शेतकऱ्यांना बाहेर काढणे, हे सर्वांसमोर एक आव्हान आहे. 

13 कोटींपैकी 11 कोटी लोकांच्या हालअपेष्टा होत आहेत. मावळत्या सरकारने पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी मदत देण्याचे घोषित केले. पण पुढे काय, हा प्रश्‍न आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली आहे. त्यामुळे राज्यपालांनी यासाठी समित्या कायम करून कार्यवाही करावी. सोबतच राज्यस्तरावर देखरेख तसेच तालुकानिहाय समित्या आणून नुकसानग्रस्तांना साहाय्य तसेच रोजगार हमीचे काम, शिधावाटप आदी कामांना अग्रक्रम द्यावा. 

राज्यपालांना भेटणार 

जनतेच्या जीवन-मरणाच्या प्रश्‍नावर राजकारणाची फारकत दिसते आहे. दोन वर्षांच्या खरिपात व येणाऱ्या रब्बी हंगामात राज्यातील सहा कोटींहून अधिक जनतेवर अभूतपूर्व संकट ओढवले आहे. आता राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे यासंबंधीचे प्रश्‍न कोण व कसे सोडवणार, याविषयी भेटीसाठी महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाने राज्यपालांना भेटीसाठी वेळ मागितल्याची माहितीही प्रा. देसरडा यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com