
औरंगाबाद : वनक्षेत्र वाढवण्यासाठी ‘इको-बटालियन’च्या सहभागातून झालेली वृक्ष लागवड आणि वृक्षांची केलेली जोपासना नक्कीच कौतुकास्पद असून वनक्षेत्र वाढविण्यात ‘इको बटालियन’चा सहभाग महत्वपूर्ण आहे. असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास साध्य करावा, अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्या.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरूवारी (ता. तीन) जिल्ह्यात सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांचा सुभेदारी विश्रामगृहात आढावा घेतला. यावेळी इको बटालियनच्या सहकार्याने केलेली वृक्षलागवड, मानव विकास कार्यक्रम, मराठवाडा विकास मंडळ, रेड क्रॉस सोसायटीने केलेले सामाजिक कार्य, जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत घेण्यात आलेले उपक्रम आदींचे सादरीकरण राज्यपाल यांच्यासमोर करण्यात आले.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, बांबू हाऊस हे देखील पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. जिल्ह्यात सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारुन करण्यात येत असलेले प्रकल्प नक्कीच इतरांसाठी अनुकरणीय ठरणार आहेत. मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील सर्वच मुलींना १२ वी पर्यंतचे शिक्षण घेणे शक्य व्हावे याकरिता गाव ते शाळा दरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने मुलींच्या शिक्षणासाठी याचा लाभ होणार आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत १२५ तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या ३१२५ अभ्यासिका कोविडमुळे बंद आहेत. सध्या कोविडचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अभ्यासिका सुरू करण्याबाबत विचार करावा. जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत माजी सैनिकांच्या विधवेस स्वयंरोजगाराकरिता देण्यात आलेली आर्थिक मदत, नागरिक मित्र पथक, औरंगाबाद स्मार्ट सीटी बस मध्ये सेवा, एमआयडीसी मध्ये माजी सैनिकांचा वाढता सहभाग हे उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत. सैनिकी मुले व मुलींच्या वसतीगृहाचे नुतनीकरण, कारगिल स्मृतीवनाचे सुशोभीकरण, बिडकीन-पैठण एमआयडीसीत कोल्ड स्टोरेजबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे देखील निर्देश यावेळी त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, प्रभारी उपायुक्त विनोद कुलकर्णी, मच्छिंद्र भांगे, सय्यदा फिरासत यांनी सादरीकरणाव्दारे माहिती दिली.
पाणीपुरवठा, आवास योजनेविषयी तक्रार
भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाला गती मिळत नाही. योजनेसाठी जागा मिळत नाही तसेच शहरासाठीच्या १६८० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या संथ कामे ही बाब शिष्टमंडळाने राज्यपालांच्या निदर्शनास आणून देत तक्रार केली. प्रविण घुगे, राजु शिंदे आदी उपस्थित होते. भाजप महिला मोर्चाने महिलांची सुरक्षितता विषयी मागण्यांचे निवेदन सादर केले.यावेळी महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी, उपाध्यक्ष अॅड. माधुरी अदवंत, शहराध्यक्ष अमृता पालोदकर, साधना सुरडकर, मनिषा मुंडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.