
औरंगाबाद : माजी मंत्री सत्तार मुंबईतच ठाण मांडून
सिल्लोड : राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदार आता टप्प्याटप्प्याने मतदार संघात परतले आहेत. त्यांचे मतदारसंघात जंगी स्वागत देखिल होत आहे. औरंगाबादेतील काही आमदार घरी परतले असले तरी माजी मंत्री तथा सिल्लोड-सोयगाव विधानसभेचे आमदार अब्दुल सत्तार हे अद्यापही मुंबईत ठाण मांडून आहे. सध्या तालुक्यातील कार्यकर्ते तसेच पदाधिकारी सत्तार यांची प्रतिक्षा करीत असल्याचे चित्र आहे.
आ. सत्तार हे मतदार संघात न परतल्यामुळे त्यांच्या समर्थक व पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहत असलेले सत्तार हे मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कॅबिनेटसह महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळविण्यासाठी प्रयत्नात आहेत. विशेष म्हणजे सत्तांतराच्या नाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांना मतदारसंघात जाण्याचे सांगितले. त्यानुसार इतर आमदारांनी मतदारसंघ गाठून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्याचबरोबर
माध्यमांशी बोलताना शिवसेनेतील नेत्यांना टार्गेट केले. औरंगाबाद जिल्ह्यातील सेना आमदारांना मतदारसंघात परतल्यानंतर विरोध होईल असे वाटत असताना मात्र मराठवाड्यातील सेनेचा विस्तार ज्या औरंगाबाद येथून झाला. त्याठिकाणी मात्र शिंदे यांच्या गटात गेलेल्या आमदारांचे स्वागत करण्यात आले आहे. मात्र, आमदार अब्दुल सत्तार अजूनही मतदारसंघात परतले नाही. त्यामुळे सत्तेच्या सारीपाटातील प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून निर्णय घेणाऱ्या सत्तारांनी अद्यापही मुंबई न सोडल्यामुळे मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतरच मतदारसंघात परतायचे असा निर्णय तर सत्तारांनी घेतला नाही ना याची चर्चा तालुक्यात मात्र जोरदारपणे सुरू आहे.
Web Title: Aurangabad Former Minister Sattar Settles In Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..