
औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच नेत्यांमध्ये उपरोधिक तर कधी मिश्कील टोलेबाजी रंगली.
विधानसभेचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते, आमदार हरिभाऊ बागडे (नाना) आणि कॉंग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांच्यात जुगलबंदी झाली. इतरांनीही एकमेकांना सल्ले दिले, एकमेकांना दाद दिली. अर्थात, त्यातून हास्याची कारंजी उडाली.
दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल रविवारी (ता.२३) घोषित झाला. त्यात बागडे यांच्यासह सर्वपक्षीय एकता विकास सहकार पॅनलचा विजय झाला. विजयानंतर झालेल्या कार्यक्रमात ही टोलेबाजी पहायला मिळाली. ‘कल्याणराव काळे म्हणाले, आम्हालाही आशीर्वाद द्या! मी म्हणतो त्यांनी सहकारात यावं, जरूर आशीर्वाद देऊ. आम्ही काही कुणाचे शत्रू नाही; पण ज्याची त्याची भूमिका पक्षीय दृष्टिकोनात वेगळी असते. सहकारात ती वेगळी ठेवावी लागते. सहकार हा सर्वांचा असतो, ’ अशा शब्दात बागडेंनी कल्याण काळे यांना चिमटा काढला. ‘आता अर्धा सहकार मिळाल्यासारखाच झाला ना नाना’ असे म्हणत काळेंनी टोला परतवला आणि मोठा हास्यकल्लोळ झाला. हाच धागा पकडून ‘मला वाटते, तुम्हाला कधी सहकारात उभा राहता येणार नाही’ असे सांगत बांगडेंनी काळेंना प्रत्युत्तर दिले. ‘तुटेल इतके ताणू नये, अशा प्रकारे धोरण असायला हवे, असे सांगत हॉटेलातील किस्सा व सहकाराचा संबंध सांगताना बागडे म्हणाले, ‘माझ्या लहानपणी एका हॉटेलमध्ये पाटी होती. तुम्हाला जेवण आवडले तर इतरांना सांगा, आवडले नसल्यास फक्त मालकाला सांगा. अर्थात मौखिक प्रचार भयंकर वाईट असतो. दूध संघात, सहकारात चांगले काम व्हावे, दूध उत्पादकांना न्याय मिळावा हा हेतू आहे. कारण अशी असंख्य गावे आहेत, जी दुधाच्या व्यवसायावर आजही सक्षम आहेत. दूध उत्पादकांसंबंधित ध्येय पूर्ण कसे करता येईल यासाठी प्रयत्न करू, दूध संघाची भरभराट करू.’
युतीचा कित्ताच गिरवला!
शिवसेना व भाजपचे बिनसल्यानंतर उभय पक्षांत वितुष्ट निर्माण झाले. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर शरसंधान साधण्याची संधी सोडत नाहीत. अगदी एकमेकांना पाण्यातही पाहिले जाते. अशा स्थितीत दूध संघावर युतीचा झेंडा फडकला, असेच म्हणावे लागेल. त्याचे कारणही तसेच आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (शिवसेना) व आमदार हरिभाऊ बागडे (भाजप) या उभयंतांनी एकत्र येत शिवसेना व भाजपची युती घडवून आणली व एकता सहकार विकास पॅनल उभे केले. बागडे-सत्तार यांच्या गटाने हा एकहाती विजय मिळवित सर्व जागा जिंकल्या. अर्थात हा युतीचा कित्ताच त्यांनी गिरवला.
बागडेंची केंद्रात लाईन क्लिअर
दूध संघाला चांगले दिवस येण्यासाठी हरिभाऊ बागडे यांच्यावर जबाबदारी आहे. भविष्यात केंद्र सरकारकडून अडचणी आल्यास तेथे हरिभाऊंची लाईन क्लिअर आहे. राज्यात थोडेफार गतिरोधक, अडथळे येतीलही; पण तेही आम्ही दूर करू. बागडे जो प्रस्ताव राज्य किंवा केंद्र शासनाला देतील, त्यावर जिल्ह्याच्या वतीने सर्व राजकारण बाजूला ठेवून त्यांना सहकार्य करायला हवे. फळे लागतात, अशाच झाडावर लोक दगड मारतात. सर्वांचे टार्गेट हरिभाऊ असतात; पण त्यांनी राजकारण करताना पारदर्शकता आणली, अशा शब्दांत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मत मांडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.