औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी अद्याप महापालिका क्षेत्रात चार लाख ४२ हजार ५०९ नागरिक लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. आत्तापर्यंत नऊ लाख ८८ हजार ४८३ नागरिकांचे लसीकरण झाल्याचे महापालिकेच्या अहवाल नमूद करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाचा टक्का वाढविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यासंदर्भात महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, शहरासाठी शासनाने १० लाख ५५ हजार ६०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार आत्तापर्यंत नऊ लाख ८८ हजार ४८३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. सहा लाख १३ हजार ९१ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर तीन लाख ७५ हजार ३९२ नागरिकांची लसीचे दोन्हीही डोस घेतले आहेत. लसीचा कोणताही डोस न घेतलेल्यांची संख्या चार लाख ४२ हजार ५०९ इतकी आहे.
६७ हजार लसींचा साठा शिल्लक
मुबलक लस मिळत नव्हत्या तेव्हा नागरिक लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी करत होते. पहाटेपासून केंद्रावर रांगा लागत होत्या. अनेक ठिकाणी रेटारेटीचे प्रकार घडले. मात्र गेल्या चार महिन्यांपासून शासनाकडून लसींचा मुबलक साठा येत आहे. सध्या महापालिकेकडे कोव्हिशिल्ड व कोवॅक्सिन लसीचा ६७ हजार ३३० एवढा साठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. मंडलेचा यांनी केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.