औरंगाबाद : शहरातील वाढती गुन्हेगारी थांबविण्याची आणि अल्पवयीन मुले व तरुणाईचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्याची गरज आहे. त्यामुळेच नशेच्या गोळ्या विक्री, खरेदी करणारे व त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी विशेष पथक स्थापन करावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
पोलिस आयुक्तांना खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले की, औरंगाबाद शहरातील अनेक अल्पवयीन मुले व तरुणाई नशेच्या आहारी गेल्याने मागील काही दिवसापासून किरकोळ कारणावरून खुनाच्या घटना घडल्या आहेत. शहरात वाढलेली गुंडगिरी आणि गुन्हेविषयक घटनांमागे नशेखोरांचे प्रमाण जास्त असल्याचे अनेक वेळा सिद्ध झालेले आहेत. नशेखोरी मुळे शहराचा गुन्हेगारीचा आलेख तेजीत वाढत असून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी आधी नशेबाजांवर लगाम घालणे अत्यावश्यक झालेले आहे.
शहरातील विविध गल्ल्यांमध्ये औषध विक्रेत्याकडून नशेखोरीच्या गोळ्या मिळत आहे. अनेक भागात छुप्या मार्गाने काही टोळ्या आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीविना गल्लीबोळातील अनेक औषध विक्रेत्याकडून बटण, ऑरेंज आणि किटकॅट च्या नावाखाली झोपेच्या गोळ्यांचा डोस देण्याचे उद्योग सर्रासपणे सुरु आहे. नशेच्या गोळ्यांमुळे अनेक जणांचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालेले असून अनेकांनी आपले प्राण गमावल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी नमूद केले. विशेष म्हणजे शहरातील अनेक पोलिस स्टेशनच्या हद्दीत नशेच्या गोळ्यांचा व्यवसाय बिनधास्तपणे सुरु आहे. पोलिस ठाण्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी यांना त्याची संपूर्ण माहिती असूनही कारवाई केली जात नाही. त्यामुळेच आयुक्तांनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली पथकाची स्थापना करून जरब बसवावी अशी मागणी खा.इम्तियाज जलील यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.