औरंगाबाद : शहरात महिनाभरात दोन वेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे शहराच्या अनेक भागात नागरिकांच्या घरात तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरून नुकसान झाले. याअनुषंगाने विविध कामे करण्यासाठी १४ कोटी ८५ लाख तीन हजार ८०४ रुपयांचा निधी महापालिकेला मिळणार आहे. हा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी महापालिकेला दिले होते. त्यानुसार शासनाने महापालिकेला माहिती कळविली आहे.
शहरात वारंवार अतिवृष्टी होत आहे. सप्टेबर महिन्यात सात व २८ तारखेला अतिवृष्टी झाली. सात तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात नाल्याला पूर आला. त्यामुळे नाल्यालगतच्या वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या भागांची अब्दुल सत्तार यांनी १० सप्टेंबरला पाहणी केली. त्यात श्रेयनगर, नूर कॉलनी, टाऊन हॉल, खाम नदी, जलाल कॉलनी भागात नुकसान झाल्याने सत्तार यांनी १४ कोटी ८५ लाख ३ हजार ८०४ रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन महापालिकेला दिले आहे.
त्यात श्रेयनगर येथील शलाका अपार्टमेंट जवळील नाल्याचे खोलीकरण करणे, रिटेनिंग वॉल बांधणे, नाल्यावर आरसीसी पूल बांधणे यासाठी एक कोटी ३८ लाख ९९ हजार ६८३ रुपये, नुर कॉलनी येथील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधण्यासाठी ७२ लाख ८२ हजार ४७९ रुपये, जलाल कॉलनी येथील नाल्यावर आरसीसी पूल बांधण्यासाठी एक कोटी तीन लाख ६१ हजार ६११ रुपये, जलाल कॉलनी हिमायत बाग ते बेगमपुरा स्मशानभूमीपर्यंत नदीचे खोलीकरण करण्याच्या कामासाठी चार कोटी ६० लाख ८१ हजार ९३१ रुपये, सलीम अली सरोवर ते खाम नदी पर्यंत आरसीसी नाला व बॉक्स कव्ल्हर्ट बांधण्यासाठी सात कोटी आठ लाख ७८ हजार १०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.