Chh. Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळित; चार दिवसांपासून नऊशेची योजना बंद

Water Crisis In Chhatrapati Sambhajinagar : परिणामी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. चार ते पाच तास उशिराने पाण्याचे टप्पे दिले जात आहेत.
Water Crisis In Chhatrapati Sambhajinagar
Water Crisis In Chhatrapati SambhajinagarSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीपुरवठ्यावरील संकटाची मालिका कायम आहे. कधी तांत्रिक कारणामुळे, तर कधी जलवाहिनी फुटल्याने पुरवठ्यात व्यत्यय येतो. आता नव्या ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवहिनीचे पाइप दोन ठिकाणी निखळले. रविवारी (ता. सात) गेवराई येथे, तर सोमवारी फारोळ्याजवळ हा प्रकार घडला.

त्यामुळे चार दिवसांपासून या योजनेद्वारे मिळणारे सुमारे २० एमएलडी पाणी शहरात येणे बंद आहे. परिणामी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. चार ते पाच तास उशिराने पाण्याचे टप्पे दिले जात आहेत.

पैठण रोडच्या रुंदीकरणासह शहराच्या मुख्य जलवाहिनीचे काम सध्या सुरू आहे. गेवराई येथे रस्ता रुंदीकरणाचे काम करताना रविवारी जेसीबीचा धक्का लागून ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली होती.

त्यानंतर तातडीने दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर काही तासांतच सोमवारी (ता. आठ) पहाटे फारोळा जलशुद्धीकरण केंद्राजवळील चौकात नव्या २५०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे काम करताना जेसीबीचा धक्का लागून ९०० मिलिमीटर व्यासाच्याच जलवाहिनीचा जॉइंट निखळला.

त्यामुळे पुन्हा शहराला होणारा पाणीपुरवठा बंद झाला. त्यानंतर दोन दिवस पाइपलाइन दुरुस्त कोणी करावी, यावर खल करण्यात आला. बुधवारी (ता. १०) कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीमार्फत सुरू करण्यात आले.

दरम्यान, सलग चार दिवसांपासून या जलवाहिनीतून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे पाण्याचे टप्पे उशिराने करावे लागत आहेत. नऊशे मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून शहराला २० एमएलडी पाणी येते. मात्र, पाइपलाइन बंद पडल्यामुळे शहराला २० एमएलडी पाण्याचा फटका बसत आहे.

हर्सूल तलाव कोरडाठाक

एकीकडे नऊशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी बंद पडलेली असताना दुसरीकडे हर्सूल तलावानेदेखील तळ गाठला आहे. काही दिवसांपासून तलावातील खड्ड्यांमधील पाणी महापालिका उचलत होती, पण आता तोही पाणीसाठा संपला आहे. पावसाळ्याच्या एका महिन्यात हर्सूल तलावात पाणी आलेले नाही.

Water Crisis In Chhatrapati Sambhajinagar
Water Supply : कोल्हापूरला जमते, सांगलीला का नाही? काळम्मावाडीतून आणले पाणी

त्यामुळे हर्सूल तलावावर विसंबून असलेल्या १४ वॉर्डांना जायकवाडी धरणाचे पाणी द्यावे लागत आहे. परिणामी अतिरिक्त पाणी लागत असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के.एम. फालक यांनी सांगितले.

नव्या नऊशे मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे पाइप फारोळ्याजवळ निखळल्यामुळे पाणीपुरवठा बंद झालेला आहे. दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, काम पूर्ण झाल्यानंतर या पाइपलाइनमधून पाणीपुरवठा सुरू केला जाईल.

— दीपक कोळी, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.