Sambhaji Nagar : संभाजीनगरवासीयांनो तुम्ही घेताय राज्यभरात सर्वांत महागडे पाणी! प्रशासनाने सांगितलं कारण..

प्रशासन म्हणते, विजेचा ‘खर्च’ जास्त म्हणून पाणी ‘महाग’!
Maharashtra Water expensive
Maharashtra Water expensiveEsakal

छ्त्रपती संभाजीनगर - ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरात नहरी, पानचक्कीद्वारे जनतेची तहान भागवली जात होती. आता ४० किलोमीटवरून आणून पाणी दिले जाते. मात्र, हे पाणी अन्य शहरांच्या तुलनेत फारच महाग आहे. विजेवरील सर्वांत जास्त खर्च आहे.

त्यामुळे पाणी महागचे तुणतुणे वाजवत बसण्यापेक्षा यातून काय मार्ग आहे? अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करून लोकांना परवडणाऱ्या दरात पिण्यासाठी पाणी कसे देता येईल? याचे आव्हान लोकप्रतिनीधी, शासन व प्रशासनाला पेलावे लागणार आहे.

जायकवाडी ते नक्षत्रवाडी असे तब्बल ४० किलोमीटरवरून शहरात पाणी आणावे लागते. त्यात जायकवाडी धरणातून शहरापर्यंत पाणी आणताना महापालिकेला अनेक ठिकाणी पंपिंग करावे लागते. पाणी ‘लिफ्ट’ करुन पुरवठा केला जातो. १८५ मीटरवर पाणी ‘लिफ्ट’ करुन मग ते शहराकडे आणले जाते. राज्यातील अन्य शहरांमध्ये ‘ग्रॅव्हिटी’ने (उताराच्या दिशेने) पाणी पुरवठा केला जातो.

Maharashtra Water expensive
Water Issue : सामान्यांची होरपळ, टँकर लॉबीची चंगळ

मात्र, आपल्या शहराला ‘ग्रॅव्हिटी’च्या उलट दिशेने पाणी आणावे लागते. जायकवाडी येथे दोन ठिकाणी ‘पंपिंग हाऊस’ आहेत. तिथून पाणी उपसा करुन पुढे ढोरकीनला ‘बुस्ट’ करावे लागते. त्यानंतर फारोळा आणि पुढे नक्षत्रवाडी येथे पाणी ‘बुस्ट’ करावे लागते. यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी ‘लिफ्ट’ करण्यासाठी वीज जास्त लागते.

साधारणत: वर्षाला ८ कोटी रुपये केवळ विजेच्या बीलापोटी द्यावे लागत असल्याने पाणीपुरवठ्याचा खर्च वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. धरणात पाणीसाठा भरपूर असला तरी तो छत्रपती संभाजीनगरकरांच्या घरापर्यंत आणता येत नाही. कारण वहन करणारी यंत्रणाच जुनाट झाली आहे. त्यामुळे दबावाने पाणी सोडले की जलवाहिनी फुटणे, गळती लागणे असे प्रकार घडतात.

महापौर
महापौरEsakal

मग दुरुस्तीसाठी वेगळा खर्च करावा लागतो. हा खर्च जनतेच्या खिशातून भागवला जातो. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक  महाग  पाणी शहरवासीयांना घ्यावे लागत आहे. मध्यंतरी ५० टक्के पाणी कपात झाल्याने, शहराची पाणीपट्टी अर्ध्यावर आली. तरीही दोन हजार रुपये म्हणजे इतर शहरांच्या तुलनेत जास्तच पाणीपट्टी आहे.

Maharashtra Water expensive
Water Issue : डोळ्यांत येतंय पाणी, नळाला नाही!

‘हर्सूल’साठीही वाढणार खर्च

हर्सूल तलावातून ‘ग्रॅव्हिटी’ने पूर्वी पाणी येत होते. ही योजना शून्य खर्चाची होती. किमान एक ते दीड लाख लोकांची तहान इथून भागवली जायची. मात्र, आता शुद्धीकरण प्रकल्प बसवल्याने या योजनेचाही खर्च वाढून तो जनतेवरच खिशातूनच वसूल केला जाणार आहे. दरम्यान, जायकवाडी धरणात सौर ऊर्जेचे पॅनेल बसवून, वीज निर्मिती केली जाईल, असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी एकदा सांगितले होते. मात्र, त्याचे पुढे अजूनतरी काहीच झालेले नाही.

कुठे किती पाणीपट्टी?

  • पुणे - १४८०

  • नाशिक - १२००

  • सांगली - १८००

  • डोंबिवली - १२००

  • संभाजीनगर - २०००

... तरी शहराचा पाणीप्रश्‍न सुटला नाही

समांतर पाणीपुरवठा योजनेचा ठराव झाला तेव्हा भाजपच्या विजया रहाटकर महापौर होत्या. त्यानंतर शिवसेनेच्या अनिता घोडले, कला ओझा, त्र्यंबक तुपे यांनी महापौर म्हणून काम पाहिले. २०१६ मध्ये पुन्हा एकदा एका वर्षासाठी भाजपचे भगवान घडमोडे महापौर झाले. त्यानंतर अडीच वर्षे शिवसेनेचे नंदकुमार घोडेले यांनी कारभार पाहिला.

तसेच पुरुषोत्तम भापकर, हर्षदीप कांबळे, प्रकाश महाजन, ओमप्रकाश बकोरिया, डी. एम. मुगळीकर, डॉ. निपुण विनायक, आस्तिककुमार पांडेय, अभिजित चौधरी या आयुक्तांनी काम पाहिले, मात्र शहराचा पाणीप्रश्‍न सुटला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com