

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: दुपारचं ऊन. तहानेनं जीव कासावीस होईल अशा उष्ण झळा. अशात दोनचा गजर झाला अन् अथांग नाथसागराचं गोड पाणी ३८ किलोमीटरचा प्रवास करीत शहरात आलं. वर्षानुवर्षे तहानेनं आसुसलेल्या डोळ्यांनी हे पाणी नुसतं पाहिलंच नाही, तर सर्वांगात भरून घेतलं अन् रणरणतं ऊनही क्षणभर सारे विसरून गेले. नक्षत्रवाडीच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोचताच फटाक्यांच्या आतषबाजीत जलपूजन करण्यात आले, त्याचवेळी ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत जणू गोदामायच अंगणात आल्याचा आनंदही साजरा करण्यात आला.