विद्यापीठाचा निर्णय खंडपीठाकडून रद्द
परीक्षा गैरव्यवहाराच्या आरोपातून विद्यार्थ्यांना दिलासा
छत्रपती संभाजीनगर, ता. ११ : परीक्षा गैरव्यवहाराच्या आरोपावरून विद्यार्थ्यावर केलेली कारवाई नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना धरून नसल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. नितीन बी. सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब डी. शिंदे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा निर्णय रद्द केला. विशेष म्हणजे, गैरव्यवहारासाठी वापरल्याचा आरोप असलेल्या १४ चिठ्ठ्या विद्यार्थ्याकडे नव्हे, तर ज्युनिअर पर्यवेक्षकाच्या खिशातून सापडल्या होत्या. या प्रकरणात विद्यार्थ्याला बचावाची पुरेशी संधीही देण्यात आली नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
महंमद मुसावीर उर रहेमान महंमद नईम हा बी. फार्मसीच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये त्याची परीक्षा सुरू असताना १५ डिसेंबरला बायोफार्मास्युटिक्स ॲण्ड फार्माको कायनेटिक्स विषयाचा पेपर होता. यावेळी भरारी पथकाने परीक्षा केंद्राची तपासणी केली. त्यात पर्यवेक्षक राहुलसिंग खैरनार यांच्या खिशात १४ चिठ्ठ्या आढळल्या. याप्रकरणी विद्यापीठाच्या अनुचित प्रकार समितीने चौकशी करून २८ मार्च २०२६ ला विद्यार्थ्याचा ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मधील परीक्षेचा निकाल रद्द केला. तसेच त्याला मे-जून २०२६च्या परीक्षेला बसण्यास प्रतिबंध केला. विद्यापीठाने ९ एप्रिल रोजी पुनर्विचार करूनही कारवाई कायम ठेवल्याने विद्यार्थ्याने ॲड. एस.आर. ढेपे यांच्या मार्फत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांतर्फे ॲड. एस.आर. ढेपे यांनी काम पाहिले, तर राज्य सरकारतर्फे सहायक सरकारी वकील एन.डी. बाटुल आणि विद्यापीठ तथा इतर प्रतिवाद्यांतर्फे ॲड. संदेश आर. पाटील यांनी युक्तिवाद केला.