KMW26A01181
खामसवाडी : देवळाली शिवारातील पिकांची पाहणी करताना पथक.
देवळाली-माळकरंजा येथे पीक पाहणी
खामसवाडी : मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने देवळाली-माळकरंजा परिसरातील सोयाबीन पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. पाण्याअभावी उभी पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त पीक पाहणी समितीने परिसरातील शेतशिवारात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते. पिकांची वस्तुस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत व योग्य पीकविमा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
.................
दिलीपसिंह गौतम यांची उपाध्यक्षपदी निवड
माडज : उमरगा पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीपसिंह गौतम यांची भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी शनिवारी (ता. ५) त्यांच्या निवडीची घोषणा केली. गौतम हे गेल्या ४० वर्षांपासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून, पक्ष संघटन वाढीसाठी त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गौतम यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
..........
‘धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा’
धाराशिव : तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा, पीक अनुदान व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. तालुकाध्यक्ष विनोद वीर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी (ता. ७) निवेदन दिले. जुलै व ऑगस्टमध्ये पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिके वाळून गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जनावरांसाठी चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पिकांचे तातडीने पंचनामे करून पीकविमा व अनुदान द्यावे, तसेच जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
................
धनगर आरक्षणासाठी ‘प्लॅन बी’ची मागणी
धाराशिव : धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका गांभीर्याने लढावी, आठ सप्टेंबरपूर्वी ठोस प्रतिज्ञापत्र दाखल करून अनुभवी व सक्षम वकिलांची नियुक्ती करावी, आरक्षणाबाबत प्रतिकूल निर्णय आल्यास धनगरांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी ‘प्लॅन बी’ तयार ठेवावा, अशी मागणी सकल धनगर समाज जिल्हा शाखेने केली. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करावा, तसेच मुंबईतील चर्चगेट रेल्वेस्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली. विविध संघटनांचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
.........
‘धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा’
परंडा : पावसाने मोठा खंड दिल्याने निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या (यूबीटी) वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी आणि पशुपालक संकटात सापडले आहेत. पशुधनासाठी चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. शासनाने दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकरी व पशुपालकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.
............
MMR26A01848
मुरूम ः येथील माधवराव पाटील महाविद्यालयाच्या विस्तार केंद्राच्या वतीने साक्षरता रॅली काढण्यात आली.
मुरूममध्ये साक्षरता दिनानिमित्त रॅली
मुरूम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या वतीने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी शहरातून साक्षरता जनजागृती रॅली काढली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांनी ‘शिक्षणाचा घेऊ ध्यास, साक्षरतेने करू देशाचा विकास’, ‘प्रत्येक हातात शिक्षणाचा प्रकाश’ अशा घोषणा देत नागरिकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विविध शाखांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि विस्तार केंद्राचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
....
MDJ26A00965
माडज : येथील हेमाडपंथी महादेव मंदिरात श्रावण महिन्यात दर्शनासाठी गर्दी होत आहे.
माडजच्या महादेव मंदिरात गर्दी
माडज : उमरगा तालुक्यातील माडज येथील हेमाडपंथी महादेव मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत आहे. पहाटे चारपासून भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल होत आहेत. भूकंपापूर्वी हे मंदिर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी होते. मात्र, भूकंपानंतर गावाचे पुनर्वसन चोहोबाजूंनी झाल्याने मंदिर गावाच्या एका बाजूस राहिले आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी दिवसभर भाविक दर्शनासाठी येत आहेत. काळाच्या ओघात मंदिराची दुरवस्था झाली होती. आता गावातील काही स्वामी मंडळींनी नित्यनेमाने पूजाअर्चा सुरू केल्याने मंदिरातील वातावरण भक्तिमय झाले आहे.