((मेन))
.....................
उत्पन्न करपलेच; पण केलेला खर्च, कष्टही बुडाले
- पाऊस ३४ दिवसांपासून गायब, ९०० कोटींचा खर्च वाया, उत्पन्न बुडाले
- जिल्ह्यात भीषण दुष्काळाचे सावट, ५० टक्क्यांहून अधिक पिके करपली
अविनाश पोफळे ः सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ७ ः ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत पावसाच्या तब्बल ३४ दिवसांच्या प्रदीर्घ खंडाने जिल्ह्यातील बळिराजाला उद्ध्वस्त केले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार ५० टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी सोयाबीन व इतर खरिपावर केलेला तब्बल ९०० कोटी रुपयांहून अधिकचा खर्च पूर्णपणे वाया गेला आहे. याशिवाय ५ हजार ७०८ रुपये प्रतिक्विंटल हमीभावानुसार ५० टक्के नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे सुमारे १ हजार ६०० कोटी रुपयांचे सोयाबीनचे उत्पन्न बुडाले आहे. कर्ज काढून केलेला खर्च वाया गेल्याने आता पीककर्ज कसे फेडायचे आणि संसाराचा गाडा कसा हाकायचा, असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
सोयाबीनच्या शेती मशागतीपासून पेरणी व खुरपणीपर्यंत एकरी १२ हजार रुपये खर्च आला आहे. ५० टक्के नुकसानीनुसार (२.२५ लाख हेक्टर) केवळ सोयाबीनवरील ६६७ कोटी आणि इतर पिकांचा मिळून ९०० कोटींहून अधिक खर्च पाण्यात गेला आहे. जिल्ह्याचे एकूण ५५ लाख ९६ हजार क्विंटल सोयाबीनचे उत्पादन ५ हजार ७०८ रुपये हमीभाव धरला तरी ते ३ हजार १९४ कोटी ६४ लाख रुपयांचे होण्याची अपेक्षा होती; परंतु ५० टक्के पिके करपल्याने थेट १ हजार ६०० कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. सध्या कृषी विभागामार्फत नुकसानीचे अंतिम पंचनामे व सर्वेक्षण सुरू असून, ही नुकसानीची टक्केवारी आणि आर्थिक फटका आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
.........
पावसाचा ३४ दिवसांचा खंड
ऑगस्ट महिन्यातील पावसाची सरासरी १५४.४ मिमी आहे. त्यापैकी महिनाभरात नाममात्र ४२.६ मिमी म्हणजेच सरासरीच्या तुलनेत २७.६ टक्के पाऊस झाला. तो देखील असमान झाला. भूम परिसरात त्याने काहीशी हजेरी लावली. तर जून ते ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ७१.७ टक्के म्हणजेच ३०४.३ मिमी पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत तब्बल २८.३ टक्क्यांची तूट नोंदवली गेली. गेल्या वर्षीच्या (५०८.३ मिमी) तुलनेत यंदा पर्जन्यमानात ४८ टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. तालुकानिहाय पावसात मोठी असमानता असून भूम तालुक्यात सर्वाधिक ९४.८ टक्के पाऊस झाला आहे. लोहारा तालुक्यात सर्वांत कमी ५१.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. लोहारा (-४८.३ टक्के), तुळजापूर (-४३ टक्के), उमरगा (-३२ टक्के) आणि धाराशिव (-३२ टक्के) या चार तालुक्यांत पावसाची मोठी तूट असल्याने येथे स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.
.......
शंभर टक्क्यांहून अधिक पेरा;
पण ५० टक्क्यांवर नुकसान
जिल्ह्यात यंदा ५ लाख २० हजार २०५ हेक्टरवर (९४ टक्के) खरीप पेरण्या झाल्या होत्या. यामध्ये सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ४ लाख १९ हजार ४८० हेक्टर असताना प्रत्यक्षात ४ लाख ५३ हजार २८५ हेक्टरवर (१०० टक्क्यांहून अधिक) पेरणी झाली होती. सुरवातीला जून-जुलैमध्ये झालेल्या पावसावर पिकांची वाढ उत्तम झाली होती. मात्र, ऐन फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या टप्प्यात ऑगस्ट महिना आणि सप्टेंबरचा पहिला आठवडा पूर्णपणे कोरडा गेल्याने हलक्या व मुरमाड जमिनीतील पिके पूर्णपणे वाळून गेली आहेत. तसेच उडीद आणि मुगाचे पीकही हातचे गेले आहे.
.........
प्रकल्पांत अवघा ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा
पावसाळ्याचे तीन महिने उलटले, तरी जिल्ह्यातील २२५ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघा ८.३६ टक्के (६०.६७ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. जिल्ह्यातील ११९ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली (तळाला) गेला असून, २० प्रकल्प पूर्णपणे कोरडेठाक पडले आहेत. सीना-कोळेगाव या एकमेव मोठ्या प्रकल्पात शून्य टक्के साठा आहे. उर्वरित प्रकल्पांतील साठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केल्याने उसासारखी बागायती पिके वाळू लागली असून, येत्या काळात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत तीव्र होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.
................
((कोट))
सध्या जिल्ह्यात तज्ज्ञांच्या तालुकानिहाय समित्यांकडून नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण सुरू आहे. उद्यापर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण होईल. प्राथमिक अंदाजानुसार पिकांचे नुकसान ५० टक्क्यांपर्यंत दिसून येत आहे. पुढेही पावसाबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याचा अंदाज आहे.
- प्रवीण चोपडे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
........................
((कोट))
खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. भीषण स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हेक्टर ५० हजार रुपयांचे उत्पन्न आणि केलेला खर्च पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करून ती शेतकऱ्यांना द्यावी.
- कैलास पाटील, आमदार
...................
((कोट))
येडशीत १८ एकर शेती बटईने केली आहे. यात सोयाबीन, उडीद पीक होते. पावसाअभावी ९९ टक्के पीक वाया गेले आहे. आता काय करायचे, हेच सूचेना. सरकारने मदत केली तरी झालेले नुकसान आणि उत्पन्न भरून निघणार नाही. मालकाचे निम्मे आणि माझे निम्मे असा दोन लाख रुपयांचा खर्च झाला आहे. हातउसने पैसे घेऊन खर्च केला होता. लेकरं, माणसे कसंही जगतील; पण जनावरे कशी पोसायची, या विचाराने झोप लागेना झाली.
- बळवंत खटके, शेतकरी, येडशी
........
धाराशिव ः करपलेले सोयाबीन पीक.
फोटो क्रमांक ः OSM26B06936