अँकर १
--
अधिक मासामुळे यंदा गणरायाचे उशिरा आगमन
१४ सप्टेंबरपासून गणेशोत्सव ः १९ दिवस उशिरा आगमन, १२ दिवसांचा मुक्काम
---
जळकोट, ता. ६ (बातमीदार) ः हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे विशेष महत्त्व आहे. श्रावण वा पवित्र महिन्यानंतर भाद्रपद महिन्यात चौथ्या दिवसापासून गणपती उत्सवाला प्रारंभ होतो. आठवड्यावर येऊन ठेपलेल्या गणपती उत्सवाची मात्र आतापासूनच लगबग सुरू असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक मासामुळे यंदा १२ दिवस उशिरा गणपती बाप्पाचे आगमन होणार असले तरी गणपती मंडळे, बँड पथक, ढोल-ताशे बुकिंग, सजावटीसाठी सरसावले असून मूर्तिकारही बाप्पांच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवत आहेत.
गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. त्यानुसार गणपती उत्सवाला १४ सप्टेंबर (सोमवार) पासून सुरवात होणार असली तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी गणपती बाप्पा १९ दिवस उशिरा विराजमान होतील. या दिवशी गणेशाची पूजा केली जाईल, तर गौरी-गणपती विसर्जन हे १९ सप्टेंबरला होणार, तर गणपती विसर्जन (अनंत चतुर्दशी) २५ सप्टेंबरला होणार आहे. म्हणजेच १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानंतर १२ व्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे.
---
मूर्तिकारांची लगबग अंतिम टप्प्यात
बाप्पांची मूर्ती बनविण्याची लगबग अखेरच्या टप्प्यात असून त्यामुळे मूर्तिकारारांनाही अधिक वेळ मिळाला आहे. मागील वर्षी २७ ऑगस्टला गणेशोत्सवाला सुरवात झाली होती तर ६ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी होती. यावर्षी मात्र बारा दिवस गणरायाचा मुक्काम राहणार असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाप्पाचे १९ दिवस उशिरा आगमन होणार असले तरी मूर्तिकारांची लगबग अंतिम टप्प्यात आहे. मूर्तिकार, गणपती मंडळे तयारीला लागले असून मूर्तीची बुकिंग होऊन पोच केली जात आहे.
---
गणेश चतुर्थीचे महत्त्व
गणेश चतुर्थी हा गणपतीचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने भक्ताला बुद्धी, समृद्धी व सौभाग्य प्राप्त होते, असे मानले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेशोत्सव सुरू होतो. हा उत्सव १०-१२ दिवस चालतो. या उत्सवात गणेशाची विधिवत पूजा केल्यास शुभफल प्राप्त होते.