फोटोसह ABD26J79189
हिंगोली ः शेतकऱ्यांनी बैलांच्या शिंगावर फलक लावून मागण्यांकडे लक्ष वेधले.
--------
हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा
----------
बैलांच्या बाशिंगावर झळकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
हिंगोली, ता.१२ (बातमीदार)ः एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे हातबलता, दुसरीकडे पोळासारखा महत्त्वाचा सण या परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी बैलाच्या बाशिंगांवर विविध मागण्यांचे फलक लावून शासनाला साद घातली आहे.
सेनगाव तालुक्यातील पानकनेरगावचा पोळा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची भीषणता मांडणारा ठरला. जिल्ह्यांत मागील महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिके हातची गेली. सोयाबीनचे पीक वाळून गेले असून काही ठिकाणी शेंगा देखील भरल्या नाहीत. त्यामुळे आता लागवडीच्या खर्चही निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी विविध राजकीय पक्षांसह संघटनांकडून केली जात आहे. त्यासाठी आंदोलने देखील उभारली जात आहेत. मात्र या संदर्भात शासनाकडून अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर होणार की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर सण उत्सव कसे साजरे करावेत असा प्रश्न उभा राहिला आहे. मात्र आहे त्या परिस्थितीत साधेपणाने का होईना सण साजरा करण्याचा निर्णय पानकनेरगाव येथील शेतकऱ्यांनी घेतला.
((चौकट)))
सरसकट कर्जमाफीची मागणी
बैल जोड्यांच्या बाशिंगावर शेतकऱ्यांनी फलकाच्या माध्यमातून त्यांच्या व्यथा मांडल्या.सरसकट कर्जमाफी करा, हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, सरकारी शाळा वाचवा, शेतकऱ्यांच्या मुलांचे भविष्य वाचवा’ आणि ‘जगाचा पोशिंदा शेतकरी, माझ्या मालकाला वाचवा’ असे संदेश देणारे फलक झळकले.
------------------