
Hostels For Students: मुंबई-दिल्लीत उभारणार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे; जयदत्त क्षीरसागर
छत्रपती संभाजीनगर : समाजातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व उच्चशिक्षणासाठी मुंबई-दिल्लीत जातात. त्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहे उभारत त्यांना मोठा आधार देणार असल्याची घोषणा अखिल भारतीय तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली.
प्रदेश तेली महासंघ व जिल्हा तेली समाजबांधवांच्यावतीने रविवारी (ता.२६) राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा दौलत लॉन्स येथे घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते झाले.
सहकारमंत्री अतुल सावे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, वैजयंती खैरे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, उद्योजक मनोहर सिंनगारे, राजेंद्र ठोंबरे, योगेश मिसाळ यांची उपस्थिती होती.
जयदत्त क्षीरसागर म्हणाले, की सामाजिक कार्य करत असताना एकत्रितपणे सर्वांनी काम करावे. विवाह मेळावा घेणे ही काळाची गरज आहे. ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचे काही देणे लागते. ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी सातत्याने मागणी करीत असल्याचेही जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.
गेल्या वीस वर्षांपासून वधू-वर मेळाव्याचे आयोजन करीत असल्याचे सोमनाथ सुरडकर यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी सुरेश मिटकर, मनोज संतान्से, विष्णू सिदलंबे, कचरू वेळंजकर, सुरेश कर्डिले, साई शेलार, बाबासाहेब पवार, सोमनाथ सुरडकर, दीपक राऊत, नीलेश सुरसे, भगवान मिटकर, भागीनाथ कर्डिले, कपिलदेव राऊत, अशोक राऊत, गणेश वाघलव्हाळे, सुदेश लुटे, भिकन राऊत, अक्षय वाघलव्हाळे, सुहास शिंदे, ज्ञानेश्वर लुटे यांनी पुढाकार घेतला.