छत्रपती संभाजीनगर : महापालिकेचे नवे प्रशासक जी. श्रीकांत यांनी पदभार स्वीकारल्यापासून बैठकांचा धडाका सुरू केला आहे. सध्या सकाळी सातपासून रात्री उशिरापर्यंत विविध विभागांचा आढावा ते घेत आहेत.
शहरातील नागरिकांना छोट्या-मोठ्या कामासाठी महापालिकेची पायरी चढण्याची गरजच पडू नये, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना घरपोच सेवा देण्यासाठी महापालिकेच्या संपूर्ण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
त्यातून अनेक नवनवीन उपाय ते अधिकाऱ्यांना सुचवीत आहेत, पण वर्षानुवर्षे एकाच पद्धतीने काम करणाऱ्या महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एवढे बदल पचनी पडतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिकेचे प्रशासक म्हणून जी. श्रीकांत यांनी तीन मेला पदभार स्वीकारला. त्यानंतर एक-दोन दिवस सुटीचे अपवाद वगळता, ते १२ तासांपेक्षा जास्त वेळ काम करत आहेत. प्रत्येक विभागाला त्यांनी पीपीटी (पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन) सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार अधिकारी, विभागप्रमुख कामाला लागले असून, महापालिकेत कार्यालयीन कामाच्या वेळी दालनात न सापडणारे अधिकारी सकाळी सातपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रशासकांच्या बैठकीला हजर राहत आहेत.
कामाची आवड म्हणून माझे पद कमी करून महापालिकेत आलो आहे, असा संदेश देत आगामी काळात प्रशासनात कसा बदल झाला पाहिजे, याच्या बारीक-बारीक टिप्स जी. श्रीकांत अधिकाऱ्यांना देत आहेत.
महापालिकेत सतीश त्रिपाठी यांच्यापासून ते मुन्सीलाल गौतम, कृष्णा भोगे, बलदेव सिंह, असीमकुमार गुप्ता, दिलीप बंड, पुरुषोत्तम भापकर अशा आयुक्तांनी काम केले आहे. यातील बोटावर मोजण्याएवढ्या आयुक्तांनाच प्रशासनावर पकड निर्माण करता आली.
अन्य आयुक्तांची गणती आले आणि गेले अशीच होती. काही आयुक्तांनी आपली प्रोफाइल पक्की करण्यासाठी महापालिकेत नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची बदली होताच असे उपक्रम फक्त कागदोपत्रीच राहिले.
नवे प्रशासक जी. श्रीकांत यांनी पदभार स्वीकारताच शहराचा जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नाला हात घालत शहराला २४ तास सात दिवस पाणी देण्याचा संकल्प जाहीर केला. त्यावर सोशल मिडीयावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या.
गेल्या दहा-बारा वर्षात कोणी शहराचा पाणीप्रश्न सोडवू शकलेले नाही, नवे प्रशासक काय जादू करणार? असे प्रश्नचिन्ह शहरवासीयांनी उभे केले. त्यासोबत दुचाकीवरून कचरा जमा करणे, नागरिकांना घरपोच विविध प्रमाणपत्र देणे, घंटागाड्यावरील भोंगे बंद करून,
नागरिकांना ॲपचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे, यासह अनेक संकल्पना जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना सुचविल्या आहेत. पण वर्षानुवर्षे एकाच पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना नव्या प्रशासकांच्या संकल्पना पचनी पडतील का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
तिजोरीत खडखडाट, विकास कामे कशी होणार?
महापालिकेचा अत्यावश्यक खर्च व येणारे उत्पन्न पाहता महिन्याला १० कोटी रुपयांचा खड्डा पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात नमूद केलेली कामे देखील होतील का? अशी शंका अधिकारीच उपस्थित करत आहेत. त्यात प्रशासकांना नव्या संकल्पना राबवायच्या असतील तर आधी तिजोरीत खडखडाट संपवावा लागणार आहे.
अधिकाऱ्यांची वानवा, कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भिस्त
महापालिकेतील अनेक महत्त्वाच्या पदावरील अधिकारी गेल्या काही वर्षात निवृत्त झाले आहेत, मात्र त्यांच्या जागेवर भरती झालेली नाही. आजघडीला महापालिकेत मंजूर पदांची संख्या ५,२०२ एवढी आहे. त्यापैकी २,९६५ एवढेच कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. २,२३७ पदे रिक्त आहेत तर दुसरीकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे जी. श्रीकांत यांच्या संकल्पना राबविणार कुणाच्या जिवावर असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.