दुष्काळ-पाणीटंचाईच्या संकटावर मात करूया
पालकमंत्री प्रताप सरनाईक : स्वातंत्र्यसैनिकांच्या जिद्दीची प्रेरणा घेण्याचे आवाहन
-----
धाराशिव, ता. १७ : मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी प्रतिकूल परिस्थितीत दाखविलेली जिद्द, त्याग आणि एकजुटीची प्रेरणा घेऊन संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या संकटावरही आपण निश्चित मात करूया. संकट कितीही मोठे असले तरी राज्य शासन धाराशिवकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त गुरुवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय समारंभात ते बोलत होते. सरनाईक यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. पोलिस पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’च्या गजरात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
यावेळी स्वातंत्र्यसैनिक बाबासाहेब जाधव, भास्करराव नायगावकर, नागनाथ कुंभार, शेषराज बनसोडे, गोविंद नलावडे, मनाबाई घोडके, तात्यासाहेब शिंदे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे-पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर आदी उपस्थित होते.
-----
पाणीटंचाईवर सूक्ष्म नियोजन
यंदा पावसाने ओढ दिल्याने तालुकानिहाय विशेष पाणीटंचाई आराखडे तयार करण्यात आले आहेत. उपलब्ध जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन, अनधिकृत पाणीउपसा रोखणे आणि पर्यायी जलस्रोतांचा वापर यावर भर दिला जात आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा आणि उपलब्ध पाणी जपून वापरा’ ही केवळ घोषणा न राहता लोकचळवळ बनावी, असे आवाहन सरनाईक यांनी केले.
-----
शेतकऱ्यांना आर्थिक आधार
शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ आणि ‘पंतप्रधान पीक विमा योजने’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
-----
पर्यटनाला चालना देणार
धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी माता मंदिर, धाराशिव लेणी, नळदुर्ग व परंडा किल्ला तसेच संत गोरक्षनाथांचा वारसा याच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच ‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा’ उपक्रमांतर्गत अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यात ५०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाला मंजुरी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
-----
अनाथ बालकांना सेवा केंद्रांची संधी
कार्यक्रमात सिद्धनाथ अनपट (तुळजापूर), आकाश जावळे (वाशी) आणि साक्षी शिंदे (कळंब) या तीन अनाथ बालकांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरीची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून मंगेश साबळे, वैभव बनसोडे, बालाजी शेरखाने, ज्ञानेश्वर माने, बब्रुवान हांकारे, पांडुरंग शेरखाने आणि दत्तात्रय राजगुरू या सात गटई कामगारांना प्रत्येकी पत्र्याचा स्टॉल आणि पाच हजार रुपयांचे आर्थिक साह्य देण्यात आले.
-----
धाराशिव : मुख्य शासकीय समारंभात बोलताना पालकमंत्री प्रताप सरनाईक. यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलिस अधीक्षक रीतू खोखर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर.
OSM26B07020