पनीरमध्ये वनस्पतीजन्य चरबीची भेसळ
----
वडगाव कोल्हाटीतील हॉटेल मनी प्लांटचा परवाना निलंबित
---
वाळूज, ता. १२ (बातमीदार) : वाळूज औद्योगिक वसाहतीतील वडगाव कोल्हाटीत हाॅटेल मनी प्लांटचा परवाना निलंबित करण्यात आला. हाॅटेलमधील पनीरमध्ये वनस्पतीजन्य चरबीची भेसळ आढळल्याने सार्वजनिक आरोग्याचे हित लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीआय) ही कारवाई केली.
या हाॅटेलमधून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पनीरचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली. त्यामध्ये दुग्धजन्य स्निग्धांश विहित मानकापेक्षा अत्यंत कमी (४२.७१ टक्के) आढळले. त्याचबरोबर त्यात ‘वनस्पतीजन्य स्निग्धांश’ची गंभीर भेसळ असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे अन्न विश्लेषकांनी हे पनीर ‘असुरक्षित’ घोषित केले. या तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये कीटक, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, पाणी चाचणीच्या अहवालाचा अभाव आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी नसणे अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. या अनुषंगाने प्रशासनाने याप्रकरणी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला हॉटेल चालकाने विहित मुदतीत कोणतेही लेखी स्पष्टीकरण किंवा सुधारात्मक अहवाल सादर केला नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा धोका लक्षात घेऊन सहायक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी द.वि. पाटील यांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत हॉटेलचा परवाना पुढील आदेशापर्यंत तत्काळ निलंबित केला आहे.
----
चालकास कडक निर्देश
एफडीएकडून वरील आदेश प्राप्त होताच हॉटेलमधील सर्व प्रकारची अन्ननिर्मिती, साठवणूक, विक्री आणि ग्राहकांना अन्नसेवा देणे तत्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रशासनाच्या लेखी परवानगीशिवाय आणि सर्व त्रुटी पूर्णपणे दूर केल्याशिवाय हॉटेल पुन्हा सुरू केल्यास कडक दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.
.............