
Raj Theckeray Sabha: औरंगाबादमध्ये वंचित, भीम आर्मीचे कार्यकर्ते ताब्यात
औरंगाबाद : आज औरंगाबादमध्ये आज राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु असून पोलिसांनी वंचित बहुजन आघाडी आणि भीम आर्मीच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली असल्याची माहिती आहे.
आज औरंगाबादमधील सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी तयारी सुरु असताना पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. दरम्यान भीम आर्मी आणि वंचितच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांपैकी काही जणांना मुंबईतून अटक करण्यात आली असून शांततेच्या दृष्टीकोनातून ताब्यात घेण्यात आलं आहे.
औरंगाबादमधील राज ठाकरे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने दिला होता पण त्याआधीच कार्यकर्त्यांना मुंबई आणि औरंगाबाद येथून अटक करण्यात आली आहे. मुंबईतील भीम आर्मीचे नेते अशोक कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
राज ठाकरेंच्या सभेपूर्वी वंचितने औरंगाबादमध्ये आयोजित केलेल्या शांतता मार्चला पोलिसांनी परवानगी नकारली आहे. सभेपूर्वी कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी परवानगी नकारली असून १० ते १२ वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
"राज ठाकरे यांना १६ अटी घालून सभा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्या सभेत या १६ अटींचं पालन नाही केलं तर आम्ही सभा सुरु असतानाच महापुरुषांच्या घोषणा देऊन सभा थांबवण्याचं काम करणार आहोत." असा इशारा भीम आर्मीचे प्रमुख अशोक कांबळे यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे तर औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमधून वंचितच्या १० ते १२ कार्यकर्त्यांना अटक केली आहे.