- प्रा. रमेश सोनवळकर
सध्या हैद्राबाद संस्थानच्या स्वातंत्र्याचा, मराठवाडा मुक्तिदिनाचा अमृतमहोत्सव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हैद्राबाद मुक्तिलढ्यानंतर आपण मुंबई राज्यात बिनशर्त सामील झालो. नागपूर करारानुसार मराठवाड्यास झुकते माप मिळेल अशी आशा होती. पण आजपर्यंत या भागाकडे दुर्लक्षच झालेले आहे. प्रत्येक गोष्ट आम्हास आंदोलन करूनच मिळवावी लागली. मग ते कृषी विद्यापीठ असो, रेल्वे रुंदीकरण असो, नवीन रेल्वे मार्ग असोत.
परळी-बीड-नगर हा मार्ग सोडला तर इतर नवीन रेल्वे मार्ग आम्हास मिळालेच नाहीत. परळी-बीड-नगर हा मार्गही मागील दहा वर्षांपासून अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते. बाकी इतर बाबतीत मराठवाड्याच्या पदरी निराशाच दिसून येते. छत्रपती संभाजीनगर सोडले तर उद्योग नसल्यातच जमा आहेत. बीड जिल्हा आजही रेल्वेसेवेपासून वंचित असल्यासारखा आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचेही तसेच.
वैद्यकीय प्रवेशाबाबत आतापर्यंत आमची ७० / ३० च्या घोळात कुचंबणा झाली. अजूनही या परिसरात दर्जेदार अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाची वानवाच आहे. अंबाजोगाई येथे मराठीचे विद्यापीठ झालेच पाहिजे आणि जिल्हा निर्मितीचा प्रश्न लवकर निकाली निघावा. पण हे सर्व प्रश्न प्रलंबित आहेत. नुकतेच परभणी येथे मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीच्या बातमीची शाई वाळते न वाळते तोच रद्द झाल्याचेही समजले.
वैधानिक विकास मंडळे होती तेव्हा खूप काही विकास झाला असे नव्हे, पण त्यांचीही मुदतवाढ गुलदस्त्यात आहे. सध्या मराठवाड्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात या भागातून स्वातंत्र्याच्या ऐतिहासिक प्रसंगांना जागवणारे कार्यक्रम होणे जसे आवश्यक आहे त्याचबरोबर या भागाच्या विकासासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी दिलेली दृष्टी आणि विचार समजून घेणेही आवश्यक आहे.
त्याचबरोबर मराठवाड्याचे मागासलेपण घालविण्यासाठी शासन पातळीवरून ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. या भागाच्या विकासाची ना कोणाला तळमळ ना आस्था. ज्यांनी अमृतमहोत्सवी कार्यक्रमाची रूपरेषा मागणीवरून शासनाकडे सादर केली त्यांनी केवळ महोत्सवी स्वरूपाचा आराखडा द्यावा. तोंडाला पाने पुसल्यागत शासनाने काही किडूकमिडूक द्यावे हे फारच दुर्दैवी आहे. शासनाने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याचे विकासप्रश्न सोडवावेत हीच अपेक्षा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.