औरंगाबाद: कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर गेल्या सोमवार (ता.सात) पासून शहर अनलॉक करण्यात आले. शहर अनलॉक करताना आस्थापना सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांनी स्वतःसह आस्थापनांत काम करणाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या (RTPCR test) करून निगेटीव्ह प्रमाणपत्र बाळगण्यासाठी सात दिवसांची मुदत संपून गेली आहे. यामुळे याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम सुरू केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला.
शासनाच्या ब्रेक द चेनच्या मार्गदर्शक तत्वानुसार शहर गेल्या सोमवार (ता. सात ) पासून पूर्णपणे अनलॉक करण्यात आले आहे. तर ग्रामीण भागात ४ वाजेपर्यंत निर्बंध शिथिल करण्यात आले. हे करताना सर्व प्रकारच्या अस्थापना, दुकानदारांना , हॉटेल, रेस्टॉरंट, बार मालकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करून घेण्याच्या सूचना केली आहे. त्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत सोमवारी ( ता. १४ ) संपली आहे. त्यामुळे आता ज्या व्यापाऱ्यांनी कोरोना चाचण्या करून घेतलेल्या नाहीत. त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार असल्याची मंगळवारी (ता. १५ ) जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी माहिती दिली. शहरात महापालिका प्रशासनाला तर ग्रामीण भागात तहसील आणि जिल्हा परिषद, नगरपालिका प्रशासनाला याबाबत सूचना देण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी म्हणाले, शहर पूर्णपणे अनलॉक झाल्याने सध्या बाजारपेठेत गर्दी उसळली आहे. त्यात बहुतेक नागरिक व व्यापारी कोरोना नियमावलींकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून येत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी महापालिका, जिल्हा परिषद आणि तहसील कार्यालयांनी फिरत्या पथकाद्वारे व्यापाऱ्यांसह नागरिकांना मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, कोरोना चाचणी तातडीने करून घ्या, असे आवाहन करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील दोन दिवस हे आवाहन केले जाणार आहे, त्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली जाईल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.