सीताखंडी घाटातील अपघात रोखण्यासाठी
उपाययोजना करा : श्रीजया चव्हाण
नांदेड, ता. १४ (बातमीदार) : नांदेड-भोकर या वर्दळीच्या मार्गावरील सीताखंडी घाटात सातत्याने होत असलेल्या अपघातांची गंभीर दखल घेत, अपघात रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार श्रीजया चव्हाण यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सीताखंडी घाटातील तीव्र वळणे, ब्लाइंड स्पॉट्स आणि अतिवेगाने धावणारी वाहने यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याचे आमदार चव्हाण यांनी पत्रात नमूद केले. जीवितहानीच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. अपघातप्रवण क्षेत्रे व ब्लाइंड स्पॉट्सवर वाहनचालकांना स्पष्ट दिसतील असे धोक्याचे इशारे देणारे मोठे फलक लावावेत. धोकादायक वळणांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी रबर स्ट्रिप्स बसवाव्यात. तसेच अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी घाटात स्पीडगन सुविधेसह कॅमेरे बसवून वेगमर्यादा ओलांडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. घाटातील वाहतुकीवर चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारावी. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा हा संवेदनशील प्रश्न असल्याने पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, असेही आमदार चव्हाण यांनी नमूद केले.