फोटोसहABD26J78745
येहळेगांव सोळंके ः पावसाने दीर्घ उघडीप दिल्याने सोयाबीनने माना टाकल्या आहेत.
--------
येहळेगाव सोळंके शिवारात
सोयाबीनने टाकल्या माना
पिके करपण्याची भीती; शेतकरी चिंतेत
येहळेगांव सोळंके ता.६ : औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगांव सोळंके परिसरात खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेले सोयाबीनचे करपण्याचा धोका आहे. पावसाने दिर्घ ओढ दिल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला असून पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे.
रिमझिम पावसावर जोमाने वाढलेले सोयाबीन माना टाकत असून, काही दिवसांत पाऊस न झाल्यास पिके करपण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यंदा सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण जेमतेम राहिले. पेरणीनंतर वेळोवेळी रिमझिम पावसामुळे पिकांची उगवण व वाढ समाधानकारक झाली. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र महिनाभरापासूनच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. त्याचा परिणाम थेट सोयाबीन पिकावर होत आहे. शेतातील वरच्या थरातील ओलावा कमी झाल्याने सोयाबीन कोमेजू लागले असून, अनेक ठिकाणी पिकाने माना टाकल्या आहे. विशेषतः ज्या शेतांत जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे अशा ठिकाणी परिस्थिती अधिक गंभीर दिसून येत आहे. त्यामुळे वाढ खुंटण्यासोबतच शेंगा भरण्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
---------
उत्पादनावर होणार परिणाम
सोयाबीनचे पीक सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. या अवस्थेत पिकाला आवश्यक ओलावा मिळणे गरजेचे आहे. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने पिकाची अवस्था खालावत आहे. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला तरच पिकास संजीवनी मिळू शकते; अन्यथा पीक करपण्याची भीती आहे. त्यामुळे उत्पादनात घट येण्याचा धोका आहे.
((कोट)))
सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने सोयाबीन जोमात आले. मात्र, आता पावसाने उघडीप दिली, उन्हाचा तडाखा वाढला असून पिकाने माना टाकायला सुरुवात केली आहे. आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
-भुजंग नामदेव इंगळे,
शेतकरी, येहळेगांव सोळंके