Water Issue : १५ वर्षांपासून पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली! दोन लाख नागरिकांची टॅंकरवर तहान

शहराचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी २,७४० कोटी रुपयांच्या नव्या पाणी योजनेचे काम सुरू झाले. दुसरीकडे दिवसेंदिवस शहरात गंभीर स्थिती निर्माण होत आहे.
water tanker
Water Tankeresakal

छत्रपती संभाजीनगर - शहराचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी २,७४० कोटी रुपयांच्या नव्या पाणी योजनेचे काम सुरू झाले. दुसरीकडे दिवसेंदिवस शहरात गंभीर स्थिती निर्माण होत आहे. ज्या भागात महापालिकेचे नळ आहेत, तिथे आठ ते दहा दिवसांआड पाणी मिळत आहे तर सुमारे दोन लाख नागरिकांना वर्षानुवर्षे टॅंकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे.

त्यासाठी महिन्याला एका कुटुंबाला सुमारे पाच ते सहा हजार रुपये खर्च करावे लागतात. वर्षाचा विचार केल्यास ही रक्कम १०० ते २०० कोटींच्या घरात जात आहे. महापालिकेच्या अपयशामुळे टॅंकर लॉबी शहरात सक्रिय होत आहे.

गेल्या दहा ते १५ वर्षांपासून पाणीटंचाई शहराच्या पाचवीला पुजली आहे. सुरवातीला एक दिवसाआड मिळणारे पाणी आता आठ ते दहा दिवसांआड मिळत आहे. त्यामुळे नागरिकांवर पाणीपाणी करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत संपूर्ण शहराला पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

एकीकडे २०४० कोटी रुपयांच्या नव्या पाणी योजनेचे काम सुरू असताना दुसरीकडे शहरातील पाणीटंचाईचा गैरफायदा घेण्यासाठी टॅंकर लॉबी सक्रिय झाली आहे. महापालिकेने नो-नेटवर्क भागात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असला तरी फक्त पिण्याचेच पाणी दिले जाते. तीन दिवसांआड २०० लिटर पाणी नो नेटवर्क भागातील नागरिकांना मिळते.

सांडपाण्यासाठी मात्र या भागातील सुमारे दोन लाख नागरिकांना वर्षभर बोअर किंवा टॅंकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागते. यासंदर्भात महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले, ‘शहरातील पाणीटंचाईमुळे नागरिकांना टॅंकरचे पाणी घ्यावे लागत आहे. महापालिकेच्या दोन्ही योजना जीर्ण झाल्या आहेत.

त्यामुळे इच्छा असूनही महापालिका नो-नेटवर्क भागातील नागरिकांना पाणी देऊ शकत नाही. टॅंकरच्या व्यवसायातून होणारी उलाढाल १०० ते २०० कोटी रुपयांपर्यंत असावी’, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. आगामी वर्षभरात पाणी योजनेचे काम पूर्ण केल्यानंतर ही टॅंकर लॉबी मोडीत काढण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

उन्हाळा येताच वाढतात भाव

उन्हाळ्यात जमिनीतील पाणीपातळी खोलवर गेल्यानंतर बोअर आटतात. त्यामुळे पाण्याची मागणी वाढते. त्याचा फायदा घेण्यासाठी टॅंकर लॉबी टॅंकरचे दर वाढवितात. सध्या पाच हजार लिटर टॅंकरचा भाव ८०० रुपये एवढा आहे तर १० हजार लिटरच्या टॅंकरचा भाव दीड हजार रुपये एवढा आहे. विशेष म्हणजे हे पाणी विहिरीचे असते.

महापालिकेचे पाणीही महागच

खासगी टॅंकरच्या पाण्याचा सांडपाण्यासाठी वापर केला जातो, तर महापालिकेच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. खासगी टॅंकरचे विहिरीच्या पाण्याचे दर पाहता महापालिकेचे पाणी थोडे महागच आहे. पाच हजार लिटरच्या टॅंकरसाठी महापालिका ८७९ रुपये घेते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com