

Beed
esakal
बीड, वडवणी: वडाच्या जमिनीकडे झेपावणाऱ्या पारंब्या म्हणजे केवळ झाडाचा देखावा नसून, त्या त्याचे खरे ‘आधारस्तंभ’ असतात. जेव्हा मानवी हस्तक्षेपातून पारंब्या छिन्नविच्छिन्न केल्या जातात, तेव्हा त्या महाकाय वसाहतीसारख्या पसरलेल्या वटवृक्षाच्या अस्तित्वाचा पायाच उखडला जातो. या पारंब्या जमिनीमध्ये घट्ट रुजून मुख्य खोडाला अवाढव्य वजन पेलण्यासाठी ताकद देतात. मात्र, त्या कापल्यामुळे झाडाचा संपूर्ण भार केवळ एकाच मुख्य खोडावर येतो आणि ते आतून कमकुवत होते. वडाच्या झाडाची पुढील वाढ आणि विस्तार त्याच्या वजनाचा समतोल राखण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. आधार देणाऱ्या या पारंब्याच नष्ट झाल्यामुळे झाडाची नवीन फांद्या पसरवण्याची क्षमता पूर्णपणे खुंटते.