शेतकऱ्यांचे नुकसान मोजण्या पलीकडे.....कोण म्हणाले ते वाचा

Shankar ann dhondge.jpg
Shankar ann dhondge.jpg

नांदेड : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी शासनाने लागू केलेल्या लॉकडाउनमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची मोजदादही करता येणार नाही, असे प्रतिपादन शेती विषयाचे अभ्यासक माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले आहे.

शेतमाल शेतीतच पडून
देशासह राज्यात कोरोना विषाणूमुळे सर्व व्यवहार ठप्प झाला आहे. मार्च महिन्याच्या ता. २२ तारखेपासून शहरासह ग्रामीण भागातही कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेकरिता सर्व व्यवहार बंद ठेवून नागरिकांनी घरातच राहण्याच्या सूचना शासनाने दिले आहेत. यामुळे अनेकांना घराबाहेर पडता आले नाही. यात शेतकऱ्यांचा शेतमाल शेतीतच पडून राहिल्यामुळे नुकसानीचे प्रमाण मोठे आहे. 

नैसर्गिक संकटाचा सामना
मागील अनेक वर्षापासून नैसर्गिक संकटाचा सामना करत असलेले शेतकरी यावर्षी खरीप हंगामाच्या शेवटी झालेल्या पावसामुळे खरिपातील नुकसान सहन करून रब्बीच्या तयारीला लागले होते. रब्बी हंगामामध्ये हरभरा गहू यासह खरिपातील तूर काढणीच्या काळातच कोणाचे संकट ओढवले आहे. यासोबतच भाजीपाला फळबाग फळ-फळावळ याची लागवडही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली. हा मालही तयार झाला, परंतु नेमका बाजारात आणण्यापूर्वी बाजार बंद झाल्यामुळे तो शेतीतच राहिला आहे. यात मोठ्या प्रमाणात केळी, टरबूज, आंबा, खरबूज आदी फळांसह भाजीपाला यांचा समावेश आहे. या सोबतच मार्केट बंद असल्यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोयाबीन, हरभरा, तुरही शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे, असे ते म्हणाले. 

खरेदीच्या यंत्रणा मर्यादित
शासनाने कृषी विषयक आस्थापना सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी खरेदीच्या यंत्रणा मर्यादित असल्यामुळे शेतकऱ्यांचा माल घरात पडून आहे. दरम्यान नाशिवंत पदार्थ असलेल्या भाजीपाला, फळांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याने शासनाने यातून शेतकऱ्यांचे मूळ भांडवलही निघण्याची शक्यता नाही. शासनाने उत्पादक ते ग्राहक अशी संकल्पना समोर आणली असली तरी ही जुजबी उपाय योजना आहे. शेतीमालाची मोठी उलढाल असल्यामुळे यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदीदार लागतात. 

नुकसान मोजता येणार नाही 
शेतकऱ्यांचे नुकसान अपरिमीत आहे. इंडस्ट्रीजचं नुकसान मोजता येईल. त्यांचा कच्चामाल तसेच तयार माल* कंपनीच्या गोडाऊनमध्ये पडून राहिल्यामुळे त्याची विक्री थांबली तरी तो नाश होणार नाही. परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत असे नाही. रोजचा माल रोज विक्री करावा लागतो. फूल उत्पादक शेतकऱ्यांचीही या लागवडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी ही मागणी पूढे येत असली तरी यातून शेतकऱ्यांचे काही भले होणार नाही. यासाठी दीर्घकालीन उपाय योजना राबविण्याची गरज आहे, असे शंकरअण्णा धोंडगे म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com