
लातूर : लॉकडाउनमुळे विविध ठिकाणी अडकलेले विद्यार्थी, यात्रेकरू, कामगार व अन्य व्यक्तींना त्यांच्या गावी जाण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली. त्यानंतर राज्य सरकारने अशी परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली.
यातच राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांची मोबाईल नंबरसह यादी सोशल मिडियावर व्हायरल झाली. परिणामी गावाकडे परत येण्यासाठी आसुसलेल्या भूमिपुत्रांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच थेट कॉल करून भंडावून सोडले आहे. मोठ्या संख्येने कॉल येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे मोबाईल हँग झाले. लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना चोवीस तासात आठ हजार कॉल आले.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउनमध्ये जिल्ह्याच्या सीमा बंद करून लोकांच्या प्रवासासाठी बंदी आणली. यामुळे परजिल्हा व परराज्यात अनेक लोक अडकून पडले. त्यांना आपल्या गावी येण्यासाठी काहीच पर्याय नव्हता. यात विद्यार्थी, यात्रेकरू, कामगार, मजूर व अन्य व्यक्तींचा सहभाग होता. मोठ्या संख्येने लोक अडकून पडले होते. गावाकडे जाण्यासाठी ते प्रयत्न करत होते. काहींनी पायी चालत जाऊन गाव गाठले. मात्र, अनेकांना हे जमले नाही. गावाकडे परत जाण्यासाठी आसुसलेल्या लोकांसाठी केंद्र सरकारने बुधवारी (ता. २९ एप्रिल) दिलासा देत गावाकडे जाण्याचा मार्ग मोकळा केला.
राज्य सरकारने गुरूवारी (ता. ३० एप्रिल) दुपारी गावाकडे परतणाऱ्यांना परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्याचे वृत्त वाऱ्यासारखे सोशल मिडियावर फिरले. त्यानंतर काही वेळातच राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबरसह यादी सोशल मिडियावरून व्हायरल झाली. यादी पाहताच थोडाही धीर न धरता गावाकडे जाण्यासाठी एका उत्सुक असलेल्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच मोबाईलवर कॉल करण्यास सुरवात केली. काही कॉल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले.
हेही वाचलेच पाहिजे - महत्त्वाची बातमी : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्याही परीक्षा पुढे ढकलल्या
मात्र, कॉलची संख्या एवढी वाढली की ती थांबता थांबेना. रात्रंदिवस कॉल सुरूच राहिले. यातूनच जिल्हाधिकाऱ्यांचे मोबाईल हँग झाले. काही जिल्हाधिकाऱ्यांनी तर मोबाईल बिझी मोडवर ठेवले तर काहींनी कंटाळून बंदच करून टाकले. आपत्तीच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांना नाईलाजाने मोबाईल घेणे बंद करून महत्वाच्या आलेल्या कॉलवर पुन्हा संपर्क करावा लागला.
व्हाटसअपवरही मेसेजचा सडा
गावी जाण्यासाठी सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन परवानगीची सुविधा जाहिर केली आहे. तरीही लोक तातडीने परवानगी मिळावी, या चुकीच्या समजातून जिल्हाधिकाऱ्यांना कॉल करत असावेत, असे मत जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी व्यक्त केले. मोबाईलवर कॉल करण्यासोबत अनेकांनी व्हाटसअप व अन्य माध्यमांतून मेसेज केले आहेत. यात गावाकडे येण्यासाठी तातडीने परवानगी देण्याची मागणी केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांकडे लक्ष देताना भूमिपुत्रांना प्रतिसाद देताना सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.