Beed News : पाठिंब्याचा यॉर्कर; क्षीरसागर भाजपच्या अधिक जवळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 bjp Jaydutt Kshirsagar Pankaja Munde beed politics

Beed News : पाठिंब्याचा यॉर्कर; क्षीरसागर भाजपच्या अधिक जवळ

बीड : लोकसभा निवडणुकीत भाजपचा थेट प्रचार करुनही क्षीरसागरांना शिवसेनेचा रस्ता पकडावा लागला. आता मात्र क्षीरसागरांनी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजप उमेदवार प्रा. किरण पाटील यांना पाठिंबा देऊन स्थानिक भाजपला कोंडीत पकडणारा यॉर्कर टाकून आपली वाट भाजपच्याच दिशेने असल्याचे स्पष्ट केले आहे.

तसे, पूर्वीपासूनच मुंडे व क्षीरसागरांचे राजकारण ‘एकमेका सहाय्य’ करु असेच राहीले. पुढच्या पिढीतही जयदत्त क्षीरसागर व पंकजा मुंडेंतील हा राजकीय ‘सामंजस्य’ करार कायम राहिला. २०१४ नंतर पंकजा मुंडेंकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद तर जिल्ह्यात राष्ट्रवादीतून एकमेव जयदत्त क्षीरसागर आमदार होते.

मात्र, क्षीरसागरांना विकास निधीत कायम सढळ मदत राहीली. अगदी क्षीरसागरांच्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयालाही बीड भाजपजनांनी हातभार लावलाच. राज्यातील भाजप मंत्र्यांसह जयदत्त क्षीरसागर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाही भेटत. अगदी बीडच्या भूयारी गटार व नगरोत्थानच्या भूमिपूजनाला राष्ट्रवादीत असतानाही क्षीरसागरांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रीत केले.

तर, लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील उमेदवार सुरेश धस यांच्या विजयाचा जल्लोष करून आपली दिशा त्यावेळी स्पष्ट केली होती. मात्र, हा चांगुलपणा आणि सामंजस्य करार ‘आपापल्या घरी सुखी राहू’ (वेगवेगळ्या पक्षांत) या सूत्रानुसार होता. म्हणूनच लोकसभा निवडणुकीत थेट भाजपचा प्रचार करणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांना ‘एक म्यानात दोन तलवारी नको’ (पंकजा मुंडे व जयदत्त क्षीरसागर दोघेही त्यावेळी ओबीसीतील मातब्बर नेते) म्हणून शिवबंधन हाती बांधावे लागले.

शेवटच्या टप्प्यात क्षीरसागरांना मंत्रिपदही मिळाले. २०१९ च्या निवडणुकीत बीडमधून जयदत्त क्षीरसागर तर परळीतून पंकजा मुंडे रिंगणात होत्या. पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला. मात्र, क्षीरसागर विजयी झाले तर जिल्ह्यात दोन मंत्री होतील ही भाजपजनांची धास्ती क्षीरसागरांच्या पराभवाला कारणीभूत ठरली.

आता राजकीय समीकरणे पुन्हा बदलली आहे. अगोदर ठाकरे सेनेपासून दुरावलेल्या क्षीरसागरांनी नगरोत्थानच्या रस्ते व नाल्यांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाताने उरकरले. त्यामुळे काही काळ क्षीरसारांची ‘वाट कोणत्या दिशेने’ असा प्रश्न पडला. पण, ठाकरेंच्या सेनेने त्यांच्या हाताचे शिवबंधन काढून घेतले. त्यामुळे आता क्षीरसागर भाजप की सेनेत, असे प्रश्न पडले.

क्षीरसागरांची संभाव्य एंट्री जिल्हा भाजपला नको आहे. त्यासाठी ताकदही पणाला लावली जात आहे. मात्र, राज्यातील सत्तांतरामुळे भाजपला विधान परिषदेतील ताकद वाढवायची असल्याने त्यांना विधान परिषदेच्या जागा ऐनकेन प्रकारे जिंकायच्या आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे हाती घेत वेगवेगळ्या खेळ्या केल्या.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघातील प्रा. किरण पाटील यांना कॉंग्रेसमधून घेऊन उमेदवारीही याचाच एक भाग आहे. निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळापासून आपले ‘पत्ते’ न उघडणाऱ्या व प्रचार प्रक्रियेपासून पूर्ण दूर असलेल्या क्षीरसागरांनी शेवटच्या टप्प्यात भाजप उमेदवार प्रा. किरण पाटील यांना पाठिंबा जाहीर करून आपली कूच भाजपच्या दिशेनेच असल्याचे स्पष्ट केले आहे.

क्षीरसागरांची ही खेळी देवेंद्र फडणवीस व भाजपच्या जवळ जाणारी आहे. दरम्यान, क्षीरसागरांकडून पाठिंबा घेण्यासाठी भाजपचे निवडणूक प्रभारी राणा जगजितसिंह पाटील जिल्ह्यात आले मात्र स्थानिक भाजपजणांनी पाठ फिरविली. यावरूनच क्षीरसागरांची भाजपच्या दिशेने असलेली वाटचाल स्थानिक भाजपजनांना नको असल्याचे स्पष्ट आहे. आता पाठिंब्याच्या निमित्ताने फडणवीस व राज्य भाजप खूश असल्याने क्षीरसागरांची भाजप एंट्री सुकर होते का स्थानिक भाजपचा ‘स्पीड ब्रेकर’ त्यांच्या भाजपमार्गे निघालेल्या वाहनाला ‘उटी’ ठरतो हे पाहावे लागणार आहे.