मांजरा नदीकाठी लातूर वॉटर ग्रीड?

१८६ गावांतील तलाव जोडणार; नव्या योजनेवर अभ्यास करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
Build high level barrages on river to prevent excess water flowing through Manjara dam
Build high level barrages on river to prevent excess water flowing through Manjara damsakal

लातूर : मांजरा धरणातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवून नदीवर ठिकठिकाणी उच्चस्तरीय बंधाऱ्यांची (बॅरेजेस) उभारणी करण्यात आली. बंधाऱ्यांच्या साखळीमुळे मांजरा नदीत बारमाही पाणी उपलब्ध झाले असून नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बॅरेजेसची संकल्पना प्रत्यक्षात आणली.

त्यापुढे एक पाऊल पुढे टाकत पालकमंत्री अमित देशमुख यांनी मांजरा नदीकाठच्या १८६ गावांतील सर्व पाझर तलाव एकमेकांना जोडण्याची नवीन लातूर वॉटर ग्रीडची संकल्पना मांडली आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या धर्तीवरील या योजनेचा अभ्यास करून आठ दिवसात अहवाल देण्याच्या सूचना त्यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिका आयुक्त अमन मित्तल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. कायंदे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, जलसंपदाच्या उपविभागीय अभियंता सुनंदा जगताप, वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जलजीवन मिशनमधून ग्रामीण भागातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मोठ्या संख्येने योजना असल्या तरी त्यासाठी पाण्याचे शाश्वत स्त्रोत उपलब्ध नाहीत. जुने स्त्रोत मजबूत करण्यासह नवीन स्त्रोत उपलब्ध करण्यावरही सरकारकडून भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जायकवाड, मांजरा व माजलगाव हे मोठी धरणे एकमेकांना जोडून मराठवाडा वॉटर ग्रीड योजना साकारत आहे. ही योजना अस्तित्वात येईपर्यंत सध्याच्या स्थानिक स्त्रोतावर अवलंबून रहावे लागणार आहे.

बॅरेजेसच्या माध्यमातून नवीन स्त्रोत उपलब्ध झाले. वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणखी नवीन स्त्रोत उपलब्ध करावे लागणार आहेत. बॅरेजेसच्या पुढे जाऊन नदीकाठच्या १८६ गावांतील पाझर व साठवण तलाव एकमेकांना सोडून लातूर वॉटर ग्रीड योजनेची पालकमंत्री देशमुख यांची संकल्पना आहे. यातूनच सोमवारी त्यांनी या १८६ गावांतील तलाव `इंटरकनेक्ट` करता येतात का, याचा अभ्यास करून आठ दिवसात अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हद्दवाढीतच जलजीवनचा लाभ द्या

जलजीवन मिशनंतर्गत महापालिका हद्दवाढीत येणाऱ्या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल व महापालिका आयुक्त मित्तल यांनी एकत्रित समन्वयाने बैठक घेवून नियोजन करावे. वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन त्यासाठी योजनेचा आराखडा तयार करावा. हद्दवाढीत येणारी गावे व लातूर शहराजवळच्या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी मांजरा व निम्न तेरणा प्रकल्पाचा आधार घेता येईल का, याचाही विचार करावा, अशी सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com