उस्मानाबाद : राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आरोपींना पकडण्याच्या ऐवजी गृहमंत्री गावगुंडासोबत फोटो काढण्यात मग्न आहेत. तपास सुरू असतानाही गृहमंत्री बी समरी फाइल करायला सांगून अत्याचारींना क्लीनचिट देत आहेत, असा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येथे केला.
अणदूर येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचारानंतर वाघ यांनी मंगळवारी (ता. दोन) पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेतील दोन आरोपी पकडले असले तरी तिसरा आरोपी अद्याप मोकाटच आहे. याअनुषंगाने त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, ‘‘अणदूर, चंद्रपूर, सास्तूर, नांदेड, साताऱ्यासह राज्यभरात नियमित अत्याचाराच्या घटना होत आहेत. या घटनांतील आरोपी पकडले जात नाहीत. त्यांना सरकार अन् पोलिस अभय देत आहेत.
औरंगाबादमधील प्रकरणात डीसीपी सांगत आहेत की, तपास सुरू आहे. तर गृहमंत्री सांगताहेत की आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे आरोप केले आहेत. असा बनाव करून तपास होण्याआधीच आरोपींना क्लीनचिट देत आहेत. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. मुंबई, महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी करताना याच पोलिसांना लोकेशन मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
पोलिस व शासकीय सेवेतील महिलांना संरक्षण देण्याची मानसिकता तयार होत नाही, तोपर्यंत कोणतेही कायदे रक्षण करू शकत नाहीत’’, असेही वाघ यावेळी म्हणाल्या. भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुद्धिजीवी प्रकोष्ठचे संयोजक दत्ता कुलकर्णी, ॲड. अनिल काळे, ॲड. नितीन भोसले, महिला जिल्हाध्यक्ष माधुरी गरड, युवा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, दीपक आलुरे व पदाधिकारी उपस्थित होते.
संपादन - गणेश पिटेकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.