दुखावलेले कॉंग्रेसचे आमदार गोरंट्याल यांचा भाजपकडे मैत्रीचा हात

Kailas Gorantyal News
Kailas Gorantyal News

जालना : पक्षात एकनिष्ठ राहूनही राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने दुखावल्या गेलेले जालना विधानसभेचे कॉंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर जाहीर कार्यक्रमात स्तुतीसुमने उधळून मैत्रिचा हात पुढे केला आहे. श्री.गोरंट्याल यांच्या भुमिकेमुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलण्याचे संकेत मिळाले आहेत. श्री.गोरंट्याल यांच्या वक्तव्याने जिल्ह्यात शिवसेनाही एकाकी पडण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजेश टोपे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, सुरेश जेथलिया, भास्कर दानवे, राजेश राऊत, शिवसेनेचे भास्कर अंबेकर या सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात श्री. गोरंट्याल यांनी जालना जिल्ह्याच्या विकासात रावासाहेब दानवे यांचे अन्य नेत्यापेक्षा अधिक योगदान कसे आहे, याविषयीचा उहापोह करीत थेट शिवसेनेकडे इशारा केल्याचे मानले जात आहे. 

जिल्ह्याच्या विकास कामासाठी श्री. दानवे यांनी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिल्याचे सुतोवाच श्री. गोरंट्याल यांनी याच कार्यक्रमात केल्याने कॉंग्रेस-शिवसेनेच्या उपस्थितीत नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी श्री. दानवे यांच्यावर निष्क्रिय असल्याची टीका केली जात असे. पंरतू गेल्या पाच वर्षात श्री. दानवे यांनीच जिल्ह्यात बडे प्रकल्प उभारून कोट्यावधी रूपयांचा निधी दिल्याने जालना शहराच्या विकासाचा आलेख उंचावल्याची कबुलीच श्री. गोरंट्याल यांनी दिली आहे. त्यामुळे भविष्यात राजकारण करतांना श्री. गोरंट्याल शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपकडे मैत्रीचा हात पुढे करीत असल्याची चर्चाही यानिमित्ताने रंगत आहे. 

भाजपमध्ये जाण्याची अनेकदा ऑफर होती, पंरतु पक्षाशी एकनिष्ठ असल्याने पक्ष बदलला नसल्याचे श्री. गोरंट्याल यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे, असे असतानाही पक्षानी मंत्रिमंडळात समावेश न करून आपल्यावर अन्याय केल्यीाच भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. ही भावना ते अनेकदा बोलून दाखवित आहेत. याच बरोबर त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. गेल्या पाच वर्षात पालिकेला केंद्राच्या योजनेतूनच अधिकचा निधी मिळाल्याने शहराच्या विकासाचा वेग वाढल्याचा दावा करीत श्री. गोरंट्याल यांनी श्री. दानवे यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. हा शिवसेनेला एकप्रकारे इशारा दिल्याचे मानल्या जात आहे. शिवसेनेच्या हातात सत्तेची दोर असतांनाही जिल्ह्यात मात्र या पक्षाचा एकही आमदार नसल्यामुळे शिवसेना एकाएकी पडते की काय असा प्रश्न कार्यकर्त्यातून व्यक्त केला जात आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर या दोन बड्या नेत्यावरच पक्षाची मदार आहे. येणाऱ्या काळात दोन्ही नेत्यांना लोकांच्या प्रश्नावर अधिक आक्रमकपणे भुमिका घेऊन लढा उभारावा लागणार आहे. श्री. गोरंट्याल यांच्या वक्तव्याने मात्र जिल्ह्यातील राजकारणातील बदलाचे वारे कोणत्या दिशेने आहेत, हे स्पष्ट झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com