हिंगोली जिल्ह्यातील ४२ गावात दूषित पाणी

photo
photo

हिंगोली:  जिल्ह्यातील ६२ गावातील पाणी नमुन्याची प्रयोगशाळेत रासायनिक तपासणी केली असता ४२ गावात दूषित पाणी आढळून आले. तसेच वीस गावात अनुजैविक तपासणी केली असता पिण्यायोग्य पाणी नसल्याचे डिसेंबर अखेर अहवालावरून स्पष्ट झाले आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले असून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. 

जिल्ह्यात दोन महिण्यांपूर्वी हातपंप, विहिरीतील पाण्यात टीडीएस, कॅल्शियम, नायट्रेट चे प्रमाण अधिक आढळून आल्याने दूषित पाण्याने शंभरी गाठली होती. मात्र पंचायत विभागाने तातडीने बिल्चिंग पावडर उपलब्ध करून दिले होते. हातपंप, विहिरी व इतर स्रोतात बिल्चिंग पावडर टाकल्याने आता ही आकडेवारी कमी होत ६२ वर आली आहे. ज्या गावातील पाणी स्रोत पिण्यायोग्य नसेल त्या स्रोतांची आरोग्य विभागामार्फत पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून त्याचा अहवाल वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभागाकडे सादर केला जातो. 
 


हातपंप, पावरपम्प, विहीरीमध्ये क्षारांचे प्रमाण अधिक

त्यानंतर पंचायत विभागाने ज्या गावातील पाणी दूषित आहे त्याठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकून पाण्यातील क्षारांची मात्रा कमी करण्यासाठी ग्रामपंचायत कडून प्रयत्न केले जातात. रासायनिक तपासणीअंती दूषित स्रोत आढळून आलेल्यामध्ये हिंगोली तालुक्यात माळहिवरा, पाटण, सायाळ, औंढा नागनाथ तालुक्‍यातील पेरजाबाद, टाकळगव्हान, वडद, शेंदूरसना; तर वसमत तालुक्यातील देऊळगाव, कवठा येथे पाच ठिकाणी हातपंपामध्ये दूषित पाणी आढळून आले. रुंज, कोर्टा येथे पाच ठिकाणी हातपंप, पावरपम्प, विहीर यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षार असल्याचे आढळून आले. तसेच कळमनुरी तालुक्यातील सेलगाव, किल्‍लेडगाव, शिवनी बुद्रुक, शेनोडी, कवडी, आखाडा बाळापूरचा समावेश आहे. 

उपविभागीय प्रयोगशाळेत तपासणी

सेनगाव तालुक्यातील आडोळ, भंडारी, कोळसा, पळशी, बाभूळगाव, सिनगी नागा या गावांचा समावेश आहे. तसेच अनुजैविक तपासणीअंती दूषित असलेल्या पाणी स्रोतांची जिल्हा प्रयोगशाळा व उपविभागीय प्रयोगशाळेत तपासणी केली असता यामध्ये हिंगोली तालुक्यातील काळकोंडी, भोगाव येथील हातपंप दूषित असल्याचे स्पष्ट झाले. कळमनुरी तालुक्यातील माळेगाव, उमरदारवाडी, कान्हेगाव, पाळोदी, गिरामवाडी, असोलवाडी, मोरवाडी, नवखा, सांडस, असोला, शिवणी खुर्द, मसोड या गावातील हातपंप, बोअरवेल, विद्युतपंप या स्रोतातील पाणी पुरवठा दूषित असल्याचे डिसेंबर अखेर सादर केलेल्या अहवालातील आकडेवारीवरून स्पस्ट झाले आहे. 

आरोग्य येऊ शकते धोक्यात 

या ६२ गावातील दूषित पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी आरोग्य विभागासह, पंचायत विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अन्यथा या दूषित पाण्याचा वापर ग्रामस्थांनी केल्यास आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे तातडीने आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून पंचायत विभागाला कळवून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com