कोरोना : संशयितावर ‘व्हीआरआरटी’ पथक ठेवणार लक्ष 

corona virus
corona virus

हिंगोली : जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशातंर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहेत. त्‍याअनुषंगाने संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी बाहेर गावावरुन येणाऱ्या प्रवाशांवर देखरेख ठेवण्यासाठी ग्राम पातळीवर गाव निहाय व्हीआरआरटी (व्हीलेज रॅपीड टीम) पथकाची स्थापना करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण हिंगोली जिल्ह्यातही आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तत्काळ उपाययोजना आखणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे बाहेर गावावरुन येणाऱ्या प्रवाशांवर देखरेख ठेवण्यासाठी ग्राम पातळीवर व्हीआरआरटी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. 

तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर आदी कर्मचाऱ्यांचा समावेश

या व्हीआरआरटी पथकामध्ये तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती यांचा समावेश आहे. या पथकामार्फत नोंद घेण्यात येत असून विहीत नमुन्यातील अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. आलेल्या प्रवाशास सर्दी, ताप, खोकला सदृश लक्षणे दिसून आल्यास त्याबाबतची माहिती आरोग्य उपकेंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. 

संशयितांचा घेणार शोध

इतर जिल्ह्यातून आलेल्यांचा शोध घेणे, तसेच बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांना १४ दिवस (होम क्‍वारंटाईन) घरामध्येच अलग ठेवणे व प्रवाशी दररोज घराबाहेर पडणार नाही, याची या पथकाकडून दखल घेण्यात येणार आहे. व्हीआरआरटी पथकास आवश्यकता वाटल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास संपर्क साधावयाचा झाल्यास त्यांनी ०२४५६-२२१४५० या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

नागरिकांनी घरीच थांबावे: तहसीलदार ज्योती पवार

वसमत : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली असून नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपापल्या घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार ज्योती पवार यांनी केले आहे. दररोज कचरा संकलन करण्यासाठी आपल्या घरासमोर गाडी येते. कचरा या घंटागाडीतच टाका, वापरलेले मास्क किंवा इतर जैविक कचरा वेगळा द्यावा, आपलं घर, परिसर स्वच्छ ठेवा, कोणताही व्यक्ती कोरोना बाधित आहे, असं समजून त्यांच्याशी अंतर ठेवून रहा, जीवनावश्यक वस्तू आपल्याला मिळत राहतील. किराणा भाजीपाला यांचा साठा करण्यासाठी गर्दी करू नका, असेही त्या म्हणाल्या.

परदेशातून आलेल्यांची माहिती प्रशासनास द्यावी

आपल्या घरी कोणी आजारी पडल्यास त्वरित ग्रामीण रुग्णालय यांच्याशी संपर्क साधावा, पुणे, मुंबई, परराज्य, परदेशातून आलेल्या लोकांची माहिती प्रशासनास द्यावी, तसे कोणी आले असेल तर त्यांना १४ दिवस विलगीकरन (वेगळं) ठेवा, त्यांचा प्रत्यक्ष संपर्क टाळा, नागरिकांनी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देवून विनाकारण घराबाहेर न पडता आपल्या घरीच थांबावे, असे आवाहन तहसीलदार श्रीमती पवार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com