Video : कृषी पर्यटनाला कोरोनाची झळ; उद्योग बंदने बिघडला उत्पनाचा ताळेबंद

file photo
file photo

परभणी : रोजगारांसाठी मेट्रो सिटीकडे धाव घेणाऱ्या ग्रामीण भागातील कामगारांना त्यांच्याच गावात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र ही संकल्पना समोर आली. या योजनेतून लोकांना रोजगारही मिळाला. परंतु, सध्याच्या कोरोना विषाणू संसर्गामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका या उद्योगाला बसला आहे. सलग दोन महिने पर्यटकांच्या भेटी नसल्याने या केंद्र चालकांचा खर्च व उत्पनाचा ताळेबंदच बिघडला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. या टाळेबंदीचा विपरित परिणाम आता समोर येऊ लागला आहे. देशातील छोट्या - मोठ्या उद्योगांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. अनेक कंपन्यांनी तोटा सहन होत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या, पगार कपातीचे धोरण स्वीकारले आहे. हे सर्व होत असताना ज्या ग्रामीण भागात कोरोना अजून म्हणावा तितका पोचला नाही त्या ग्रामीण भागातील व्यवसायांचे तर पुरते कंबरडे मोडले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीशी पूरक व्यवसाय करून समृद्धी साधली जावी यासाठी राज्य शासनाने ग्रामीण कृषी पर्यटनासारख्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमतेचा मार्ग सुरू करून दिला. परंतु, या कोरोना विषाणू संसर्गामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीचा विपरित परिणाम कृषी पर्यटनावरदेखील झाला आहे.

पर्यटन केंद्रांमुळे मिळतो रोजगार
या पर्यटन केंद्रांमुळे ग्रामीण भागातच रोजगार निर्मिती होत असते. यातून गावाचा विकासदेखील होऊ शकतो. गावातील इतर व्यवसायालादेखील यामुळे उभारी मिळू शकते. गावातील महिला बचत गट, शेतकरी व स्थानिक कलावंतांना हे हक्काचे व्यासपीठ म्हणून ही वापरता येते.

राज्यातील ६३८ केंद्र बंद
राज्यात आज घडीला कृषी पर्यंटनाचे ६३८ केंद्र आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून शेती उद्योग, कृषी संशोधन, पर्यटन असे अनेक उपक्रम राबविले जातात. परंतु, सध्याच्या घडीला कोरोनाच्या संसर्गामुळे हे पर्यटन केंद्र बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून या पर्यटन केंद्रांकडे कुणीच फिरकलेले नाहीत. त्यामुळे उत्पन्न बंद असतांनाही या केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसह कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च मात्र केंद्र चालकांना करावा लागत आहे.

विशेष पॅकेजमध्ये सवलत नाही
कोरोना संसर्गातून उद्योगजगताला बाहेर काढण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाने विशेष पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजमध्ये कृषी उद्योगाला भरपूर प्रमाणात सोयी सुविधा, देण्यात आलेल्या आहेत. परंतु, कृषीपूरक उद्योगात मोडणाऱ्या कृषी पर्यटन केंद्राच्या पुनरुजीवनासाठी कोणतीच तरतूद करण्यात आलेली नाही, याची खंत केंद्र चालकांना वाटत आहे.

अशा आहेत अपेक्षा
केंद्रास सेवा कर लावण्यात येऊ नये
केंद्रास कृषिपंपाचा विद्युत दर कमी असावा
कृषी पर्यटनासाठी रस्ते दुरुस्ती करावी


शासनाने सवलती द्याव्यात
आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये दूरचे व महागडे गर्दीचे पर्यटनस्थळी जाणे, लोकांसाठी शक्य नाही. म्हणून आपल्या परिसरातील कृषी पर्यटनाला भेट देणे व कुटुंबाच्या सोबत निसर्ग सहवासाचा आनंद घेणे हाच पर्यटनाचा पर्याय ठरू शकतो. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन सोयी, सवलती द्याव्यात, ही अपेक्षा.
- डॉ. संजय टाकळकर, संचालक, श्रीराम बाग ॲग्रो टुरिझम ॲड फन पार्क, परभणी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com