हिंगोलीत पाच वर्षीय बालकाला कोरोनाची लागन

file photo
file photo

हिंगोली :  जिल्ह्यातील सेनगाव येथील विलगीकरण कक्षात भरती असलेल्या पाच वर्षीय बालकाचा कोरोना तपासणीचा अहवाल मंगळवारी (ता. २८) पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १४ वर पोहचली असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. यामुळे मात्र आता जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. काही काळ ग्रीनझोन ठरलेला हिंगोली जिल्हा आता रेड झोनच्या मार्गावर असून मराठवाड्यात औरंगाबाद पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर येऊन ठेपला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील १४ रुग्णांमध्ये १२ जन हे राज्य सुरक्षा बलाचे जवान आहेत. तर अन्य एका व्यक्तीसह विलगीकरण कक्षातील पाच वर्षे बालकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला. हिंगोली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १४ वर पोहोचली असल्याने हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातच राहून शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्हा औटघटकेपुरता का होईना कोरोना मुक्त झाला होता

प्रारंभी जिल्हा प्रशासनाने विविध उपाय योजना हाती घेत जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालविले होते. मात्र (ता. २८) मार्च रोजी मर्कज येथून आलेल्या एका व्यक्तीला कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याने त्याचा अहवाल (ता.२) फेब्रुवारीला पॉझिटिव्ह आल्याने त्या व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात १४ दिवस भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला घरी पाठवण्यात आले होते. त्यामुळे हिंगोली जिल्हा औटघटकेपुरता का होईना कोरोना मुक्त झाला होता. 

जिल्ह्यातील संख्या १४ वर पोहचली आहे.

त्यानंतर मागील आठवड्यात मालेगाव, मुंबई येथून बंदोबस्तावरून परतलेले १९४ जवान हिंगोलीत दाखल झाले असता त्यांची तपासणी करून स्वॅब नमुने प्रयोग शाळेकडे पाठविले होते. यातील सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुन्हा जालना येथून आलेला जवान हिवरा बेलचा राहणार असून त्याचा ही अहवाल पॉझिटिव्ह आला. सोमवारी पुन्हा दोघे पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या तेरा वर पोहचली होती. मंगळवारी (ता.28) त्यात पुन्हा सेनगाव तालुक्यातील पाच वर्षीय बालकाला कोरोना झाल्याने आता ही संख्या १४ वर पोहचली आहे.

खानापूरसह हिवराबेल कन्टेन्टमेन्ट करण्यात आले

मर्कज कनेक्शन नंतर राज्य राखीव दलाच्या जवानांनी मालेगाव, मुंबई येथे बंदोबस्तावर गेले असताना कोरोना व्यक्तीशी संपर्क आल्याने बारा जवानांचा पहिला अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता त्या सर्व जवानांना शासकीय रुगग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील इतर ९२ लोकांना देखील क्वारंटाइन केले आहे. याशिवाय हिवराबेल येथील कोरोना बाधित संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले असून खानापूरसह हिवराबेल कन्टेन्टमेन्ट करण्यात आले. असून सोमवारी सायंकाळी एका चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भिरडा येथील त्यांच्या संपर्कातील नागरिकांना देखील क्वारंटाईन करण्यात आले.

मराठवाड्यात हिंगोली जिल्हा कोरोनाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर

औरंगाबाद पाठोपाठ मराठवाड्यात हिंगोली जिल्हा कोरोनाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. आता जिल्हा प्रशासनाला कोरोनामुक्त जिल्हा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार असून लॉकडाऊन काळात कडक भूमिका घ्यावी लागेल तरच कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येईल.

राज्य राखीव बलातील एकूण १२ जवान

सद्यस्थितीत हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात कोविड- १९ ची लागण झालेल्या हिंगोली व जालना येथील राज्य राखीव बलातील एकूण १२ जवान तसेच जालना येथुन आपल्या गावी आलेल्या जवानाच्या संपर्कात आलेला एक व्यक्ती असे एकूण १३ व मंगळवारी पाच वर्षीय बालकांना लागन झाल्याने ही संख्या आता १४ वर गेली आहे. या रुग्णांना येथील आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
 
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ९३२ रुग्णांना दाखल 

तसेच हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ९३२ रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आज रोजी ६०२ रुग्ण भरती असून, ३०३ रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर १४ रुग्णांचा कोवीड- १९ अहवाल हा पॉझिटीव्ह आला असून ६१६ व्यक्तींचा कोवीड- १९ अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. ३३० रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली आहे.

जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे

कोरोनाविरुध्द लढ्यात हिंगोलीकरांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच सर्व नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com